शेकापची कामे सुरू करण्याची मागणी
ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील कोषाणे येथून वावे जाणारा दोन किलोमीटर लांबीचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बनविला जात आहे. साडेतीन कोटींचा निधी मंजूर असलेल्या या रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरु असून, गेली दीड-दोन महिने रस्त्याचे कामच बंद आहे. दरम्यान, रस्त्याचे काम बंद असल्याने कोषाणे गावातील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असून, शेतकरी कामगार पक्षाने रस्त्याचे रखडलेले काम सुरू करावे, अशी मागणी केली आहे. आशियाई विकास यंत्रणेच्या अर्थ सहायता मधून साडे तीन कोटींचा निधी मंजूर झाला आणि कोषाणे ते वावे या दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली. एप्रिल 2021 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत हा रस्ता पूर्ण करायचा असून, दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामासाठी तब्बल साडेतीन कोटींचा निधी मंजूर आहे. नवी मुंबई येथील श्री सिद्धिविनायक कंस्ट्रक्शन कंपनीने या कामाचा ठेका मिळविला आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या नियमानुसार कोषाणे येथून वावे रस्ता तयार करण्याच्या कामाला ठेकेदार कंपनीने पावसाळ्यात सुरुवात केली. ठेकेदार कंपनीने या रस्त्याचे काम करताना मुंबई-पुणे रेल्वे मार्गाच्या हद्दीत असून, वावे गावाकडे जाणारा रस्त्याचे काम सुरु केले आणि साधारण 500 मीटर लांबीचा रस्ता तयार आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर गेली अनेक दिवस रस्त्याचे कामच बंद आहे. त्यामुळे जुन्या खड्डेमय रस्त्यातून वाट काढत ग्रामस्थ रस्ता पार करीत आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.
या रस्त्यासाठी आशियाई बँकेचे अर्थसहाय्य मिळाले आहे.मात्र, गेली काही महिने या बँकेकडून आमच्या प्रकल्पावर अर्थ साहाय्य मिळाले नसल्याने कामे मंदगतीने सुरु आहेत.
राहुल चौरे, शाखा अभियंता, महाराष्ट्र ग्रामीण विकास यंत्रणा
कोषाणे ते वावे रस्त्याचे काम काही महिने थांबलेले
हा रस्ता अनेक वर्षे टिकावा यासाठी आम्ही लक्ष देत आहोत. रस्त्याचे काम थांबल्याने आम्ही पनवेल येथे जाऊन महाराष्ट्र ग्रामीण विकास यंत्रणेला पत्र देऊन रस्त्याचे काम त्वरित सुरु करण्याची मागणी केली आहे. – रामदास शेलार, शेकाप उमरोली विभाग