| चौल | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचा जवळपास आठ दशकांचा प्रवास हा शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचित आणि बहुजन समाजाच्या न्यायासाठी अखंड लढण्याचा इतिहास आहे. पक्षाची खरी ताकद ही सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यात आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने गावागावात जाऊन गोरगरीबांच्या समस्या समजून घेत त्या सोडविण्यासाठी अहोरात्र काम केले पाहिजे, असे आवाहन सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी केले.
ते म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळापासून शेकापने कष्टकरी, शेतकरी आणि वंचितांच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष केला आहे. अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाची विचारधारा खांद्यावर घेऊन राज्याच्या राजकारणात प्रभावी प्रतिनिधित्व केले आणि जनतेचे प्रश्न शासनदरबारी मांडून न्याय मिळवून दिला. स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्या कार्याचा गौरव करत ते म्हणाले, देशाच्या राजकीय इतिहासात अकरा वेळा विधानसभेवर निवडून जाण्याचा विक्रम करणारे स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांनी सांगोल्यासह महाराष्ट्रातील शेतकरी, कामगार आणि कष्टकरी वर्गाचे प्रश्न विधानसभेत प्रभावीपणे मांडून त्यांना न्याय मिळवून दिला. त्यांचा संघर्ष आजही कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे.
सध्याच्या परिस्थितीचा उल्लेख करत त्यांनी बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांवर भाष्य केले. चित्रलेखा पाटील आणि ॲड. साम्या कोरडे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर प्रभावी आवाज उठवला. अशाच पद्धतीने प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेचे प्रश्न घेऊन लोकांमध्ये गेले पाहिजे. पक्ष वाढविण्याची हीच योग्य वेळ असून प्रत्येक गावात संघटन मजबूत करण्यासाठी चोवीस तास काम करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत आ. देशमुख म्हणाले, भाई जयंत पाटील यांच्या नेतृत्वामुळेच पक्षाला नवी उभारी मिळत आहे. त्यांनी भविष्यातही पक्षासाठी असाच वेळ द्यावा आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत राहावे. भाषणाच्या शेवटी आ. देशमुख यांनी “शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो… लाल बावट्याचा विजय असो!” अशी घोषणा दिली. त्याला उपस्थित हजारो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी “भाई जयंत पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं” या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी अहोरात्र काम करा : आ. बाबासाहेब देशमुख
