। चिरनेर । वार्ताहर ।
जासईमधील 32 शेतकर्यांच्या जमिनी सिडकोने रेल्वे प्रकल्पाकरिता संपादित केल्या आहेत. त्यांना मागील 22 वर्षांपासून साडेबारा टक्के भूखंड न दिल्याने गव्हाण ते जासई या मार्गाला जोडणार्या पुलाचे काम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे खारकोपर ते उरण रेल्वे मार्गाचे काम रखडण्याची शक्यता आहे.
खारकोपर ते उरण रेल्वे मार्गाचे काम जानेवारी 2023 ला पूर्ण करण्याचा इरादा रेल्वे प्रशासनाने जाहीर केला आहे. त्यासाठी सध्या या मार्गाच्या कामाने वेग धरला होता. हा प्रकल्प रेल्वे व सिडको यांच्या भागीदारीतून उभारण्यात येत आहे. त्यासाठी जासई येथील शेतकर्यांच्या जमिनी सिडकोने संपादित केल्या आहेत. या जमिनीच्या मोबदल्यात शेतकर्यांना साडेबारा टक्के भूखंड देय आहे. मात्र, 22 वर्षे लोटल्यानंतरही जासईमधील शेतकर्यांना सिडकोकडून वारंवार फक्त आश्वासने दिली गेली.