| अलिबाग | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाने ज्यांना मदत केली. त्यांनी विश्वासघात केला आहे. याची चिड असंख्य कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. या निवडणुकीत तटकरेंना चिरडून टाकायचा निर्धार केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अनंत गीतेंना प्रचंड मतांनी निवडून देण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकापसह इंडिया आघाडीच्या वतीने कार्यकर्ता मेळावा शनिवारी (दि.13) पांडबादेवी येथील जय मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आ. जयंत पाटील बोलत होते.
यावेळी इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते, माजी आ. पंडित पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, रायगड जिल्हा परिषद माजी अर्थ सभापती चित्रा पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, काँग्रेसच्या जिल्हा महिला अध्यक्षा ॲड. श्रध्दा ठाकूर, उध्दव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, किशोर जैन, विष्णू पाटील, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, सवाई पाटील, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, पिंट्या ठाकूर, शिवसेना तालुका प्रमुख शंकर गुरव, दिपश्री पोटफोडे, प्रदिप नाईक, वृषाली ठोसर, अनिल चोपडा, अजय गोजी, बाळु पाटील, स्नेहल देवळेकर, सुधीर थळे आदी शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच इंडिया आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, महिला, तरुणवर्ग उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना, आ. जयंत पाटील म्हणाले की, शेतकरी कामगार पक्षाने शाहू, फुले आंबेडकरांचे विचार घेत समाजाच्या हितासाठी काम केले आहे. कार्यकर्ता हाच पक्षाचा आत्मा आहे. हे जाणून श्रमजीवी, कष्टकरी जनतेला केंद्रबिंदू मानून काम केले आहे. नाना पाटील यांच्यानंतर आज पाचवी पिढी जनतेची सेवा करीत असल्याचे समाधान आहे. देशात, राज्यात राजकारण दिवसेंदिवस बदलत आहे. अनेकजण स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलत आहेत. मात्र शेकापक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आपल्या विचाराशी आजही ठाम आहेत. त्याचा मला अभिमान आहे. आता आपल्याला या निवडणूकीत एक वेगळ्या उमेदीने काम करायचे आहे. वेगळ्या पध्दतीने काम करून अनंत गीते यांना निवडून दयायचे आहे. रायगडसह खारेपाटातील कार्यकर्ता पेटून उठला आहे. शेकापच्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न केलात, तर लक्षात ठेवा, पुन्हा कधीच उभे राहणार नाही, असे आ. जयंत पाटील यांनी आक्रमक होऊन सुनील तटकरे यांना टोला लगावला.
शेतकरी कामगार पक्षाचे आमदार म्हणून विधी मंडळात काम करीत असताना आपल्या विचाराशी, तत्वाशी ठाम राहिले आहे. परंतु सध्याचे लोकप्रतिनिधी टक्केवारीसाठी लाचार होताना दिसून येत आहे. कारण यांची बांधिलकी पैसेवाल्यांबरोबरच, टक्केवारी वाल्यांसोबत राहिली आहे, असे आ. पाटील म्हणाले. शेतकरी कामगार पक्ष हा कार्यकर्ता घडविणारा कारखाना आहे. विरोधातील अनेक कार्यकर्ते शेकापच्या तालीमीतून शिकले आहेत. ज्यांना घडविले, मोठे केले, ते विरोधात गेले. त्यांना लहान करायला वेळ लागणार नाही. हे विरोधकांनी लक्षात ठेवावे, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला.
गीतेंचा विजय मीनाक्षी पाटील यांना श्रध्दांजली ठरेल: माजी आ. पंडित पाटील इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांचा खासदार, मंत्री म्हणून दिल्लीमध्ये एक वेगळा दबदबा राहिला आहे. गीतेंसारखा प्रामाणिक उमेदवार शोधून सापडणार नाही. ज्यांना शेकापच्या मदतीने खासदार केले. त्यांचे दिवस आता बोटावर मोजण्या इतकेच राहिले आहेत. आपला विजय हा नक्कीच आहे. या निवडणुकीत गीतेंना बहुमतांनी निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा. इंडिया आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यात चांगल्या पध्दतीने काम सुरु आहे. ही आघाडी कायम राहिली पाहिजे. आपली लढाई ही श्रमशक्ती विरुध्द धनशक्ती अशी आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी जिद्दीने अनंत गीतेंना निवडून द्यायचे आहे. अनंत गीतेंचा विजय हा खऱ्या अर्थाने माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांना श्रध्दांजली ठरणार आहे, असे पंडित पाटील म्हणाले.
जिल्ह्यातील प्रश्न सोडविण्यासाठी गीते कटीबध्द राहणार: चित्रा पाटील आंबेडकर, शाहू यांच्या पुरोगामी विचारसरणीच्या, शेतकरी कामगार पक्षाच्या संपन्न अशा कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या, अतिशय अभ्यासू, कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, सहकार क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे चळवळ करणाऱ्या मनमिळावू स्वभावाच्या आणि लोक कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य ज्यांनी चळवळीसाठी उभं केले, त्या रायगडच्या रणरागिणी मीनाक्षी पाटील. त्यांच्या निधनानंतर ही पहिली राजकीय सभा आहे. मीनाक्षी पाटील यांनी शेकाप नेते जयंत पाटील, माजी आ. पंडित पाटील, ॲड. आस्वाद पाटील आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना एकत्र बांधून राजकीय वाटचाल करण्याची शिकवण दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या सभेत आज मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या आहेत. या महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच खारेपाटातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी अनंत गीते कटीबध्द राहतील, असा विश्वास आहे, असे जिल्हा परिषद माजी अर्थ सभापती चित्रा पाटील यांनी प्रस्तावनेत सांगितले.
भाजपला हद्दपार करण्याची गरज- ॲड. श्रध्दा ठाकूर लोकसभा 2024 ही निवडणूक महत्वाची आहे. वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणेचा आधार घेत सत्ताधाऱ्यांविरोधात बोलणाऱ्यांना वेठीस धरण्याचे काम केले जात आहे. ज्याप्रमाणे रशियामध्ये पुतिन यांच्यामार्फत विरोधक नष्ट करण्याचे काम केले जात आहे. त्याप्रमाणे आपल्या देशात परिस्थिती निर्माण केली जात आहे. भारतीय संविधानाने समानता निर्माण केली आहे. ही समानता नष्ट करण्याचे काम केेले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत मोदीसह भाजपला हद्दपार करण्याची गरज आहे. त्यामुळे रायगड लोकसभा निवडणुकीत गीतेंना भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन रायगड जिल्हा काँग्रेसच्या महिला अध्यक्षा ॲड. श्रध्दा ठाकूर यांनी केले.