पुढील दोन दिवस कोकणात ‘यलो अलर्ट’

। रायगड । प्रतिनिधी ।

राज्याच्या काही भागात पुढील दोन दिवस पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसाळ्यात एवढा पाऊस पडूनही वातावरणातील उकाडा कायम आहे. त्यातच ‘ऑक्टोबर हिट’ने भर घातली आहे. राज्याच्या काही भागातून मोसमी पावसाच्या परतीची वाटचाल सुरू झाली आहे. काही ठिकाणी मात्र ती व्हायची आहे. दरम्यान, उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. एकीकडे ढगाळ वातावरण तर दुसरीकडे उन्हाचा तडाखा अशा चक्रव्यूहात नागरिक अडकले आहेत. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने पुढील दोन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. राज्याच्या काही भागांत पावसाच्या तुरळक सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

परतीचा पाऊस उत्तर भारतातून वेगाने पुढे महाराष्ट्रात आला आहे. मात्र, तो नंदूरबारमध्येच अडखळला. अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण आणि उकाडा असे संमिश्र वातावरण तयार झाले आहे. शनिवार आणि रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढचे तीन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर 12 ते 16 ऑक्टोबरपर्यंत मराठवाडा, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर सोलापूर अशा 18 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही दिवस पुन्हा राज्यात पावसाची शक्यता असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसासाठी पोषक हवामान झाल्यामुळे पुढील काही दिवस राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.

Exit mobile version