जिल्हाधिकार्यांचे लाभले मार्गदर्शन
| अलिबाग | अमोल नाईक |
होय, मी कलेक्टर बनण्याचं स्वप्न राशी बाळगलं असून, त्यासाठी जी मेहनत,अभ्यास करायचा आहे तो पूर्णपणे करुन मनी बाळगलेले स्वप्न पूर्ण करणारच असा ध्यास भातसई,ता.रोहा येथील स्वरा कैलास खरीवले या विद्यार्थिनीने घेतला असून,तिचे हे ध्येय साध्य करण्यासाठी दस्तूरखुद्द रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनीही तिला सखोल मार्गदर्शन करीत यशस्वी भव असा आशिर्वादही दिला.
स्वरा ही रोहा तालुक्यातील भातसई गावातील एक हुशार आणि मेहनती मुलगी, सध्या ती इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे. तिची शैक्षणिक प्रगती चांगली आहे. तिला दरवर्षी 95 टक्के हून अधिक गुण मिळतात, इयत्ता सहावीला तिला 96.82 टक्के गुण मिळाले होते. तर स्कॉलरशिप परीक्षेत ती रोहा तालुक्यात पहिली आली होती. शेकापच्या माध्यमातून सुरू असलेल्या गावोगावी सायकल वाटप कार्यक्रमात तिची आणि शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांची भेट झाली अन त्यांनी सवयीनुसार सहजच स्वराला एक प्रश्न विचारला तुला पुढील शिक्षण घेऊन काय बनण्याची इच्छा आहे ? तिने क्षणाचाही विलंब न लावता लगेच संगितले मला भरपूर शिक्षण घेऊन कलेक्टर व्हायचे आहे. आई बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. पण त्यासाठी कशा प्रकारचे शिक्षण घ्यायचे असते, त्याचा अभ्यासक्रम कसा असतो याची तिला काहीही कल्पना नव्हती पण कलेक्टरचं व्हायचे ही जिद्द आहे.
चित्रलेखा पाटील यांचा पुढाकार
वडील कैलास खरीवले गुरुदेव इंजिनिअर वर्कशॉप रोहा येथे मोलमजुरी करतात तर आई गृहिणी आहे. एका जिद्दी आणि होतकरू मुलीचे करियर घडविण्यासाठी, तिचे भविष्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चित्रलेखा पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना संपर्क केला आणि स्वराची कलेक्टर होण्याची इच्छा आहे, आता ती लहान आहे पण आतापासून आपण तिला अधिकारी होण्याचे बाळकडू दिलेत तर आतापासून तिला अभ्यास कसा करावा आणि स्पर्धा परीक्षांना कसे सामोरे जायचे याची समज होईल. कल्याणकर यांनीही क्षणाचाही विलंब न लावता, आपल्या व्यस्त कामात असून सुद्धा तिला माझ्या भेटीस पाठवून द्या मी तिला मार्गदर्शन करतो असे सांगितले.
सोमवारी संध्याकाळी 5 वाजता भेटण्याची वेळ निश्चित झाली. स्वरा आणि तिचे वडील कैलास खरीवले, सीएफटीआय ट्रस्टचे विशेष कार्यकारी अधिकारी अमित देशपांडे त्यांच्या भेटीकरिता त्यांच्या दालनात गेलो.
मुळातच एमपीएससी युपीएससी ती एक तपश्चर्या आहे. त्याला नुसती अक्कल, नुसती जिद्द, पैसा असून चालत नाही. त्यासाठी एक वृत्ती लागते. समाजात बदल घडवून आणण्यासाठी, एक भली मोठी शासनपद्धती चालवण्याची ती व्यवस्था आहे. या व्यवस्थेत आपण कसे फिट आहोत, समाजात बदल घडवून आणण्याची क्षमता, सर्व स्तरांतील सामाजिक घटकांसाठीची कणव लागते, तेथील सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक बाजू काय आहेत ? याची माहिती हवी असते. अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करणे ही खरी तपश्चर्या असते याची कल्पना होती. पण स्वराला या सर्व गोष्टी नव्याने समजून घ्यायच्या होत्या. एवढ्या मोठ्या अधिकाराच्या सोबत सविस्तर चर्चा करायची हे स्वरा वर मोठे दडपण होते. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी पटवून दिले की, बहुतांशी तरुणांचे मला कलेक्टर बनण्याचे स्वप्न असते असे सांगतात पण खरे सांगायचे तर कोणीही डायरेक्ट कलेक्टर होत नसतो त्या मागे भरपूर मेहनत आणि अभ्यास असावा लागतो या सोबतच कलेक्टर व्हायचे आहे असे न म्हणता मला आयएएस अधिकारी व्हायचे आहे असे पहिले म्हटलेे पाहिजे असे पटवून दिले.
उत्तम प्रशासकाची गरज
देशातील प्रशासकीय व्यवस्था सुरळीत चालवण्यासाठी एक उत्तम प्रशासकाची गरज असते आणि यामध्ये आयुक्त, उपआयुक्त, जिल्हाधिकारी यासारखे प्रशासक लागतात आणि त्यासाठी आयएएस आणि आयपीएस या सारख्या परीक्षा देवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी लागतात. आयएएस हे एक पद आहे जे भारतामधील नामांकित आणि आदरणीय पदापैकी एक आहे. बहुतेक आयुक्त, उपआयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य सचिव आणि सार्वजनिक क्षेत्रातील विभाग प्रमुख हे सर्व आय एएस पदवीधर असतात,अशी माहितीही त्यांनी दिली.
स्वराशी बोलताना कल्याणकर यांनी तिला शैक्षणिक पात्रतेविषयीची माहिती दिली.कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी आयएएस परीक्षेला बसण्याकरिता पात्र असतो. आता रायगड जिल्ह्याकरिता ‘जिल्हा स्पर्धा परीक्षा केंद्र’ या नावाचा अॅपसुद्धा तयार केला आहे. त्याच्या अभ्यासिका सुद्धा सुरू आहेत तज्ज्ञ मार्गदर्शन करत आहेत.आयएएस अधिकारी होण्याकरिता वेगवेगळ्या विषयांचा जास्तीत जास्त अवांतर अभ्यास करत राहिले पाहिजे, ज्या विषयात आवड आहे त्या विषयाचा जास्त खोलात जाऊन अभ्यास केला पाहिजे, रोज वेगवेगळी इंग्रजी, मराठी वृत्तपत्र वाचली पाहिजेत, आपला गाव, तालुका, जिल्हा याचा खोलात जाऊन अभ्यास केला पाहिजे. वेगवेगळ्या प्रश्नांचे उपप्रश्न तयार करायचे त्यातून सामान्य ज्ञानामध्ये भर पडते. वातावरण बदलाची माहिती घेणे, उन्हाळ्यात पाऊस, पावसाळ्यात कडक ऊन, सध्या तापमानात आमुलाग्र बदल झाला आहे, तापमान लहरी झाले आहे याचे संकलन करून ठेवले पाहिजे. जगात काय चालू आहे त्याच्या घडामोडी, माहिती मिळवायची, त्याचा अभ्यास करायचा, एखादा छंद जोपासायचा, विविध स्पर्धा परीक्षा देत राहायचे.असा सल्लाही जिल्हाधिकार्यानी स्वराला दिला.
एनसीईआरटी आणि आयसीएससी बोर्डाची पुस्तकांचा जास्तीत जास्त वाचन करत राहिले पाहिजे त्याच प्रमाणे लिहण्याचा सराव असला पाहिजे. कोणत्याही विषयावर समर्पक 200 शब्दांत लिहिता आले पाहिजे.
कलेक्टर हे एक पद आहे त्या करिता पहिले आय ए एस अधिकारी व्हावे लागते. त्यानंतर 2 ते 3 वर्ष ट्रेनिंग असते त्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करतात किंवा महापालिका आयुक्त करतात. कलेक्टर हे पद सर्विसमध्ये आल्या नंतर 16 वर्षचं मिळते, त्यानंतर सेक्रेटरी होता येते ही सर्व पदे आयएएस मधील आहेत. कलेक्टर व्हायचे आहे असे न म्हणता मला आयएएस अधिकारी बनायचे आहे असे म्हटले पाहिजे. -डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी
काही अधिकारी सांगतात की आम्ही 12 तास 18 तास रोज अभ्यास करायचो असे काही नाही, तर मला वाटत की आपला अभ्यासाचा पिंड असला पाहिजे. फक्त चांगले टक्के असून उपयोग होत नाही तर परिस्थिती कशी हाताळता हे पण महत्वाचे असते. बहुसंख्य विद्यार्थी आपल्या उराशी मोठे आधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगून रात्रंदिवस मेहनत करत असतात, पण त्यांच्यापैकी कठोर मेहनत करणार्यानाच या पदावर विराजमान होता येते हे मात्र तितकेच खरे आहे. स्वराचे कलेक्टर बनण्याचे स्वप्न त्यासाठी लागणारी पूर्व तयारी याची पूर्णपणे माहिती कलेक्टरांनी दिली. जीवन म्हणजे एक अनंत आव्हान, प्रदीर्घ साहस व पात्रतेची कसोटी असते हे पटवून दिले.