। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ शहरातील गटारांची साफसफाई होत नसल्याने दुर्गंधीयुक्त गटारांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुर्गंधीयुक्त गटारांमुळे आणि त्यात झालेल्या जंतूमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी, नागरिक हैराण झाले असून, नेरळ ग्रामपंचायतीने तात्काळ गटारांमध्ये जंतुनाशक फवारणी सुरू करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.
नेरळ ग्रामपंचायत हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायत प्रशासन आणि नेरळ ग्रामपंचायतीचा आरोग्य विभाग करतो तरी काय? असा प्रश्न यानिमित्ताने नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. डासांचा उपद्रव कमी करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून गटांरामध्ये औषध फवारणी, सोसायट्यांजवळील आवारात फवारणी केली जात होती. परंतु, शहरात गेल्या काही महिन्यांपासून यापैकी कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने दिसून येत आहे. नेरळ ग्रामपंचायत सार्वजनिक स्वच्छता, औषध फवारणी अशा कामांवर वर्षाला लाखो रुपये खर्च करते. मात्र, त्या तुलनेत गटारांची स्वच्छता होताना दिसत नाही. सध्या शहरातील निर्माणनगरी, स्टेशन परिसरात डासांच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, जंतू पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने लवकरात लवकर जंतुनाशक फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.