। आपटा । वार्ताहर ।
आपटा गावात असणार्या तळ्याची दुरवस्था झाली असून, ग्रामपंचायतीचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे तळ्याच्या सभोवती घाणीचे साम्राज्य पसरले असून, कचर्याचे ढीग तसेच विविध प्रकारच्या बाटल्यांचा खच पहावयास मिळत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आपटा गावात सरदार बिवलकर यांनी ग्रामस्थांसाठी स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा, यासाठी व्यवस्था केली होती. परंतु, आज याच तळ्याची अवस्था बिकट होऊन सभोवताली घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याकडे संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे तळ्यावर जाण्यासाठी असलेल्या वाटादेखील वाढलेल्या गवताने झाकून गेल्या आहेत. राज्य सरकारकडून पाणी वाचवा व भूजलाची जपणूक करा यासाठी निधी देण्यात येतो, परंतु, येथील आमदार, खासदार व राजकीय पक्षांना याकडे लक्ष देण्यास वेळ नाही, त्यामुळे तळ्याची दुरवस्था झाली आहे.
आपटा गावाचे सौंदर्य असलेल्या या भागाकडे देणे गरजेचे असून, किमान सर्व तळी व परिसरात साफसफाई केली पाहिजे. पूर्वी या तळ्याचे पाणी धुणेभांडी व गणपती विसर्जन करण्यासाठी केले जात होते, परंतु, आता हे शक्य नाही. अशा दुर्लक्षित तळ्यांकडे संबंधित यंत्रणेने लक्ष घालावे, अशी मागणी पत्रकार संघाचे अध्यक्ष व पत्रकार करीत आहेत.