। चणेरा । प्रतिनिधी ।
रोहा-नागोठणे मार्गावरील भिसे खिंडीत झालेल्या भीषण अपघातात 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. याअपघाताप्रकरणी भरधाव आणि निष्काळजीपणे डंपर चालवणाऱ्या चालकाविरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अष्टमी कोळीवाडा येथील राज गणेश पतंगे (22) हे आपल्या केटीएम दुचाकीवरून नागोठणेहून रोहाकडे येत होते. दरम्यान, शनिवारी (दि.20) रात्री सुमारे 10.10 वाजण्याच्या सुमारास रोहा-नागोठणे रोडवरील भिसे खिंडीत हा भीषण अपघात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पंकज अरुण मिस्ञि (रा. पाटणसई, ता. रोहा) हा आपल्या ताब्यातील डंपर (क्र. एमएच-06/बीव्ही-7594) घेऊन जात असताना घाटातील वळणावर रस्त्याची परिस्थिती आणि वाहतुकीची पर्वा न करता भरधाव वेगाने वाहन चालवत होता. याचवेळी समोरून येणाऱ्या राज पतंगे यांच्या केटीएम मोटारसायकलला (क्र. एमएच-06/सीटी-6609) डंपरची जोरदार धडक बसली. या भीषण धडकेत राज पतंगे गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, रोहा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
विशेष म्हणजे, अपघात घडल्यानंतर डंपर चालकाने जखमीला मदत करण्याऐवजी अथवा पोलिसांना माहिती देण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
या प्रकरणी पुष्कर महेंद्र जावरे (वय 24, रा. एकता नगर, रोहा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोहा पोलीस ठाण्यात आरोपी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासकीय अंमलदार पोलीस शिपाई संजय पायक करीत आहेत.
राज पतंगे यांच्या अकाली निधनामुळे अष्टमी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच भिसे खिंडीत वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर अधिक प्रभावी वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षाव्यवस्था उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.







