। पनवेल ग्रामीण । प्रतिनिधी ।
पनवेल तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक दुर्दैवी घटना घडली आहे. भेकरेवाडी-शिरवली गाव परिसरात मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेला कळंबोलीतील तरुण मयूर पाटील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. या घटनेनंतर पोलीस, एनडीआरएफ, अग्निशामक दल आणि ग्रामस्थांकडून त्याचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कळंबोली येथे वास्तव्यास असलेला व मूळचा धुळे जिल्ह्यातील मयूर पाटील हा पाच ते सहा मित्रांसह मंगळवारी (दि. 7) भेकरेवाडी-शिरवली परिसरात फिरण्यासाठी गेला होता. परिसरातील पाण्यात उतरून पोहत असताना त्याचा पाय घसरला. पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने तो काही क्षणांतच वाहून गेला. मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला. घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, अंधार आणि पाण्याचा वाढलेला प्रवाह यामुळे शोधकार्याला मर्यादा आल्या.
बुधवारी (दि.8) सकाळी एनडीआरएफ, अग्निशामक दल, पनवेल तालुका पोलीस आणि ग्रामस्थांनी संयुक्तपणे शोधमोहीम पुन्हा सुरू केली. मुसळधार पाऊस आणि वेगवान पाण्याच्या प्रवाहामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण होत असले तरी बचाव पथकांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, पावसाळ्यात नदी, ओढे, धबधबे आणि वेगवान पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे, तसेच स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
भेकरेवाडी येथे तरुण पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता
