| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
राज्यात सत्तांतर होताच रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेला पुन्हा वेग आला आहे.रायगड जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांचे प्रभाग आरक्षण सोडत 13 जुलैला जाहीर होणार आहे.या सोडतीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिलेले आहे.इच्छुकांनी त्यासाठी मोर्चेबांधणीही सुरु केलेली आहे.आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- 15 ते 21 जुलै असा राहणार आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या प्रभाग आरक्षणासाठी 13/ जुलैला सकाळी 11 वाजता, जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन सभागृह येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. अलिबाग पंचायत समितीची जंजिरा सभागृह, पोलीस मुख्यालय अलिबाग येथे होणार आहे. मुरुड पंचायत समिती बैठक नानासाहेब धर्माधिकारी सभागृह पंचायत समिती कार्यालय दरबार हॉल पेण पंचायत समिती बैठक तहसिलदार कार्यालय सभागृह पेण, पनवेल पंचायत समिती बैठक क्रांतीवीर वासूदेव बळवंत फडके नाटयगृह पनवेल.
उरण पंचायत समिती बैठक पंचायत समिती सभागृह, कर्जत पंचायत समिती बैठक प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र ,चार फाटा कर्जत येथील सभागृह, खालापूर पंचायत समिती बैठक सरनौबत नेताजी पालकर सभागृह, तहसिल कार्यालय खालापूर, येथे रोहा पंचायत समिती बैठक द.ग.तटकरे सभागृह पंचायत समिती रोहा, सुधागड पंचायत समिती बैठक श्री.बल्लाळेश्वर देवस्थान, भक्त निवास क्र.1 सुधागड, माणगाव पंचायत समितीची बैठक मध्यवर्ती प्रशासकीय भवन सभागृह,पहिला मजला, तहसिल कार्यालय माणगाव, तळा पंचायत समितीची बैठक नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, पहिला मजला, पंचायत समिती कार्यालयात होणार आहे. महाड पंचायत समिती बैठक बहुउददेशीय सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे होणार आहे. पोलादपूर पंचायत समिती बैठक कै.बॅ.नाथ पै.सभागृह पंचायत समिती कार्यालय होणार आहे.
म्हसळा पंचायत समितीची बैठक पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.या बैठकांना जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची सदर सभेस हजर राहण्याची इच्छा आहे, त्यांनी वरील ठिकाणी व वेळी हजर राहावे, असे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कळविले आहे.
चौकट
राजकीय घडामोडी वाढणार
दरम्यान,जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडतीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिलेले आहे.आरक्षणानुसार राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.सध्या राज्यातील राजकीय वातावरण बदलले आहे.महाविकास आघाडी सरकार जाऊन शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर दाखल झालेले आहे.त्या सरकारमध्ये भाजपही सहभागी झालेला असल्याने आगामी काळात रायगडातील राजकीय बदल मोठ्या प्रमाणात होणार आहेत.त्याचे पडसाद जिल्हा परिषद,पंचायत समित्यांसह नगरपरिषदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे.
मावळत्या जिल्हा परिषदेत शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादीची पाच वर्षे निर्विवाद सत्ता होती.आता आगामी काळात कोणते राजकीय पक्ष युती,आघाडी करतात की स्वबळावर निवडणुका लढवितात यावर स्थानिक स्वराज्य संस्थाचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.