350हून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
। पनवेल । प्रतिनिधी ।
एकीकडे सरकार “बेटी बचाव, बेटी पढाव“ तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवत असल्याचा दावा करत आहे. मात्र, दुसरीकडे तळोजा पेंधर गावातील जिल्हा परिषद शाळेची अवस्था गेल्या दोन वर्षांपासून अत्यंत दयनीय झाली असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेकडो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि पालकांनी केला आहे.
शाळेची इमारत धोकादायक घोषित झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी तात्पुरती पर्यायी व्यवस्था करण्यात आली. मात्र, शाळा व्यवस्थापन समितीकडून रायगड जिल्हा शिक्षणाधिकारी, पंचायत समिती शिक्षणाधिकारी आणि पनवेल महानगरपालिका शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे समोर आले आहे.
सध्या विद्यार्थ्यांना मंदिर तसेच इतर खासगी ठिकाणी शिक्षण घ्यावे लागत असून, वर्गखोल्यांच्या अभावामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. तब्बल दोन वर्षांचा कालावधी उलटूनही शाळेची दुरुस्ती किंवा नवीन इमारत उभारण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याने पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षी शाळेत 150हून अधिक नवीन प्रवेश झाले असून, एकूण विद्यार्थी संख्या 350 च्या पुढे गेली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यांच्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पर्यायी शैक्षणिक व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच नवीन शाळा इमारत किंवा दुरुस्तीच्या कामाला त्वरित मंजुरी देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश लक्ष्मण भोईर, वसंत महादू पाटील, राम कमलाकर खेरणेकर, वैशाली राम खेरणेकर, शिक्षक, कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश भोईर यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले की, “शाळेच्या प्रश्नावर तातडीने कार्यवाही झाली नाही तर पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांसह तीव्र ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल.“ आता विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हा गंभीर प्रश्न सरकार आणि प्रशासन कोणत्या पद्धतीने सोडवते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.







