भाई ॲड.नारायण गोले पाटील यांच्या इशाऱ्यानंतर तहसीलदारांनी घेतला कर्ज वाटपाचा आढावा
माजलगाव | प्रतिनिधी ।
सर्वसामान्य शेतकरी हा पेरणीच्या काळामध्ये अडचणीत असतो अशावेळी कर्जासाठी जे शेतकरी पात्र असतील, त्या सर्व शेतकऱ्यांना कर्ज मिळाले पाहिजे. पात्र असणारा एकही शेतकरी यातून सुटता कामा नये, असे आदेश माजलगावच्या तहसीलदारांनी तालुक्यातील बँक अधिकाऱ्यांना दिले आहेत.
माजलगाव तालुक्यातील बॅंका शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाकरीता हेकेखोरपणाची भूमिका घेत असून हजारो शेतकरी ऐन हंगामात बॅंकेच्या दारावर ताटकळत उभे ठेवले होते. याबाबतची तक्रार शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड.नारायण गोले पाटील यांच्या कडे अनेक शेतकऱ्यांनी केली होती. याचा जाब विचारण्यासाठी बॅंकेत गेलेल्या भाई ॲड.नारायण गोले पाटील यांचेशी चर्चा करण्यास नकार दिल्यानंतर शेतकरी कामगार पक्षातर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला होता. शेतकरी कामगार पक्षाच्या आक्रमक भूमिकेनंतर माजलगाच्या तहसीलदारांनी तालुक्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी आणि शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांची आज तहसील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा किट्टी आडगाव, शाखा टाकरवन, शाखा दिंद्रुड , शाखा माजलगाव व स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा माजलगाव बीड रोड, स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा तालखेड येथील सर्व शाखा अधिकारी आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड. नारायण गोलेपाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकापचे कार्यकर्ते व शेतकरी यांच्या उपस्थितीत नायब तहसीलदार अशोक भंडारी यांनी पिक कर्जा संदर्भातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर बैठक घेऊन पीक कर्जाच्या वाटपाचा आढावा घेतला.
दरम्यान कोणीही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, याची बँकांनी दक्षता घ्यावी, अशी आग्रही भूमिका भाई ॲड. नारायण गोलेपाटिल यांनी घेतली. बैठकीत उपस्थित सर्व बॅंक शाखा अधिकारी यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या या भूमिकेला समर्थन देऊन शेतकऱ्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे मान्य केले.
या बैठकीस शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड. नारायण गोले पाटील यांच्यासह भाई लहू सोळंके, सतीश रिंगणे, बालासाहेब शिंदे, अशोक सुरवसे, सिद्धेश्वर गायकवाड, सुदाम चव्हाण, सुभाष थोरात, कृष्णा सोळंके, देशमाने, पंडीत यांच्यासह शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते.