मृत्यूदरात वाढ होण्यास डॉ.गवई, डॉ. गवळीच जबाबदार
आरोग्य कर्मचार्यांच्या खोटया रजेेंमुळेच मृत्यूदर वाढला
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांचा गौप्सस्फोट
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार कोणालाही किरकोळ, अर्जित रजा न देण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही बरेच आरोग्य कर्मचारी मुद्दाम खोटे कारण सांगून वैद्यकिय अर्जित रजेवर जात आहेत. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई, वैद्यकिय अधिकारी डॉ. सुचिता गवळी हे वारंवार विनाकारण रजेवर असल्यामुळे मनुष्यबळ आणखीनच कमी झाले. जिल्हाधिकार्यांनी त्यांना आपत्ती व्यवस्थापन कायद्यांअतर्गत तातडीने हजर होण्याचे आदेश दिले. मात्र दरम्यानच्या काळात कोरोना रुग्णांचे हाल होऊन मृत्यूदर वाढल्याचा गौप्यस्फोट डॉ. सुहास माने यांनी केला आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील मनमानी कारभार चव्हाट्यावर आला असून अंतर्गत वादाचा फटका मात्र रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना सहन करावा लागत आहे.
‘कृषीवल’ने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माने यांच्या कारभाराबाबत प्रसिद्ध केलेल्या वृत्ताबाबत त्यांनी कृषीवलकडे स्वतःवरील आरोप खोटे असल्याचे सांगत डॉ. प्रमोद गवई व डॉ. सुचिता गवळी यांच्या चुका दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढे त्यांनी पत्रकात म्हंटले कि, 15 जुलै 2020 पासून ते जिल्हा शल्यचिकित्सक पदावर रुजू झाले. शासनाच्या आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार संदर्भ क्र. 02 अन्वये कोणालाही किरकोळ, अर्जित रजा देऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. बरेच आरोग्य कर्मचारी मुद्दाम खोटे कारण सांगून वैद्यकिय अधिकारी/कर्मचारी 15 दिवस ते 1 महिना सुट्टीवर जातात. त्यातच अशा वैद्यकिय किंवा अर्जित रजा घेतल्यामुळे मनुष्यबळ कमी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून कोणालाही रजा देत नाही. तसेच स्वतः एकही रजा घेलेली नाही.
दुसर्या लाटेत मदतीसाठी असणारे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गवई, वैद्यकिय अधिकारी डॉ. गवळी हे वारंवार विनाकारण रजेवर असल्यामुळे मनुष्यबळ आणखीनच कमी झाले. दरम्यानच्या काळामध्ये कोरोना रुग्णांचे हाल होऊन मृत्यूदर वाढला. सध्या कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मनुष्यबळ अपुरे पडत आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील सर्वच आरोग्य कर्मचार्यांवर मानसिक ताण वाढलेला आहे. त्यामुळे इतरांना सुट्टी घेण्यापासून रोखले आहे, असेही त्यांनी पत्रकात म्हंटले आहे.