। अलिबाग । प्रतिनिधी ।
हवामान खात्याने वर्तवलेला अतिवृष्टीचा अंदाज गुरुवारी (ता. 10) पुन्हा चुकला. हवामान विभागाने मुंबईसह रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केल्यामुळे दोन दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. मात्र सकाळी दहा वाजल्यानंतर अलिबागमध्ये चटके देणारे ऊन पडले होते. त्यामुळे हवामान विभागाचा अतिवृष्टीचा अंदाज चुकल्यावरुन तरुणांनी खिल्ली उडविल्याची चर्चा सर्वत्र ऐकू येत होती.
हवामान विभागाने संपुर्ण कोकणासह रायगड जिल्ह्यात गुरुवारी पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवत रेड अलर्ट जारी केला होता. त्यामुळे या भागात नागरिकांना अनावश्यक घराबाहेर पडू नये, असे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले होते; परंतु प्रत्यक्षात पाऊस झालाच नाही.