। पनवेल । वार्ताहर ।
दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याचे साठे आटत असल्याने माणसांप्रमाणेच पशू-पक्ष्यांनाही पाणीटंचाई जाणवते. पनवेल तालुक्यातील गोवा-मुंबई महामार्गावर कर्नाळा अभयारण्यातील पाणीसाठेही आटू लागले आहेत. पशू-पक्ष्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, याकरिता वन विभागाने कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत.
दरवर्षी उन्हाळ्यात वन विभागाकडून कृत्रिम पाणवठे तयार करण्यात येत असून यंदा उष्मा अधिकच वाढल्याने पशू-पक्ष्यांनाही झळा बसू लागल्या आहेत. अभयारण्य परिसरात 27 ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आल्याची माहिती वन विभागाच्या अधिकार्यांनी दिली आहे. वन विभागाने नेमलेले कर्मचारी कृत्रिम पाणवठ्यापर्यंत पाणी पोचवण्याचे काम करत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मार्च महिन्यापासूनच उन्हाचा पारा वाढला आहे. तापमान वाढीचा फटका पशू-पक्ष्यांना बसू लागला आहे. पनवेलपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कर्नाळा अभयारण्यात विविध प्रकारचे पशू-पक्ष्यांचे वास्तव्य आहे. याशिवाय स्थलांतरित पक्षीही मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे वर्षभर अभयारण्यात पर्यटकांची गर्दी असते. फेब्रुवारी-मार्च महिन्यांपर्यंत अभयारण्यातील पाणवठ्यांवर मुबलक पाणी असते; परंतु तापमान जसजसे वाढू लागते, तसे एप्रिल महिन्यापासून नैसर्गिक पाणवठे कोरडे पडू लागतात. तलावातील पातळीही खालावते. उन्हामुळे पशू-पक्ष्यांनाही डिहायड्रेशनचा त्रास होतो. पाण्याविना त्यांची भटकंती टळावी, यासाठी वनक्षेत्रात 27 कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. कर्नाळा पक्षी अभयारण्यात दोन नैसर्गिक पाणवठे आहेत. मात्र उन्हाळ्यात हे पाणवठे कोरडे पडतात, शिवाय तलावांची पातळीही खालावते. त्यामुळे अभयारण्यातील पशू-पक्ष्यांना पूर्णपणे कृत्रिम पाणवठ्यातून मिळणार्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते.
दरम्यान कोरोना संसर्गामुळे कर्नाळा पक्षी अभयारण्य दोन वर्षे पर्यटकांसाठी बंद होते. संसर्ग कमी झाल्याने ते खुले झाले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून अभयारण्यात पर्यटकांची संख्या आहे. उन्हाळ्याच्या सुट्या लागल्यावर पर्यटकांची संख्या आणखी वाढेल, असा विश्वास वन विभागाच्या अधिकार्यांकडून व्यक्त होत आहे.
कर्नाळा पक्षी अभयारण्यात 27 कृत्रिम पाणवठे; वन विभागाकडून उपायययोजना
