20 हजार क्विंटल बियाणे, 8 हजार मेट्रिक टन खताचा पुरवठा
| अलिबाग | भारत रांजणकर |
जिल्ह्याच्या सर्वच भागात मान्सून चांगलाच सक्रिय झाला असून, पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी आनंदीत आहेत. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पुरेसे बियाणे आणि खतसाठा उपलब्ध असून, त्याची टंचाई जाणवणार नाही. रायगड जिल्ह्यासाठी 20 हजार क्विंटल बियाणे, तर 8 हजार मेट्रिक टन खताचा पुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यात 17 जूनअखेर सरासरीच्या 8 टक्के पाऊस झाला आहे. भात, नाचणी, वरी या प्रमुख तीन पिकांच्या पेरणीसाठी शेतकर्यांची लगबग सुरू आहे. पेरणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. भातपिकाची 80 टक्के क्षेत्रावरील रोपवाटिकांची लावणी झाली असून, नाचणीची 24 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले यांनी सांगितले. सध्या शेतकरी नांगरणीच्या कामात व्यस्त आहेत.
खरीप हंगामासाठी जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. जिल्ह्यास एकूण 20 हजार 20 मेट्रिक टन इतका खताचा साठा खरीप हंगामासाठी मंजूर झाला आहे. एप्रिल ते जूनमध्ये महिनानिहाय मंजूर साठा 10 हजार 211 मेट्रिक टन असून, 7 हजार 832 मेट्रिक टन इतका पुरवठा झालेला आहे. जिल्ह्यात सध्या युरिया 5 हजार 302 मेट्रिक टन इतका उपलब्ध असल्याचे बाणखेले यांनी सांगितले. महाबीजकडून संकरित आणि सुधारित वाणांच्या बियाणे एकूण 5 हजार 436 क्विंटल, तर खासगी 14 हजार 990 क्विंटल बियाणे प्राप्त झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुरेसे बियाणे उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
उत्पादकता वाढवणार
राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून कमी उत्पादकता असलेल्या गावात वेगवेगळ्या उपाययोजना किंवा प्रयोग करून उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न कृषी विभागाने सुरू केला आहे. भातपिकाचे रत्नागिरी- 8, कर्जत- 8, कर्जत-9 या जातीच्या प्रमाणित बियाण्यांचे वाटप शेतकर्यांना करण्यात येत आहे. तसेच भात पिकांची पिक प्रात्यक्षिके 750 हेक्टर क्षेत्रावर राबविण्यात येत असून, 300 क्विंटल बियाणे 50 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून भात व नाचणी पिकाची उत्पादकता कमी असलेल्या गावातील शेतकर्यांना 10 वर्षांच्या आतील वाणांच्या सुधारीत प्रमाणित बियाणे वाटप सुरू आहे. भातपिकाचे 120 हेक्टर प्रात्यक्षिकासाठी 60 क्विंटल व नागली पिकांचे 1 हजार हेक्टर प्रात्यक्षिकासाठी 50 क्विंटल सुधारित बियाणे वाटप करण्यात आलेले आहे, अशी माहिती बाणखेले यांनी दिली.
खरीप हंगामासाठी शेतकर्यांनी खते, बियाणे, कीटकनाशके खरेदी करताना अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडून खरेदी करावी. या निविष्ठांचे पक्के बिल घ्यावे आणि ते तसेच पॅकिंग मटेरिअल कापणीपर्यंत जतन करून ठेवावे जेणेकरून भविष्यात काही कारवाई किंवा भरपाई, अनुदान देण्याची वेळ आली तर ते उपयोगात येईल.
उज्ज्वला बाणखेले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी