| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यात असलेल्या पाली भुतीवली लघुपाटबंधारे प्रकल्पामध्ये पाणीसाठा काठोकाठ आहे. धरण भरून धरणाच्या संडव्यातून पाणी वाहून जाऊ लागल्याने मंगळवारी (दि.15) ग्रामस्थांच्यावतीने जलदेवतेचे विधिवत पुजन करण्यात आले. शासकीय अधिकारी आणि वेगवेगळ्या संस्थांमधील लोकप्रतिनिधी यांच्याकडून धरणातील पाण्याचे जलपूजन केले जाते. यावर्षी कोणताही शासकीय अधिकारी आणि कोणताही लोकप्रतिनिधी फिरकला नाही. शेवटी ग्रामस्थांनी आपल्या परिसरातील धरणाच्या जलाशयात साठलेल्या पाण्याचे साडी चोळी अर्पण करीत जलदेवता अशीच कृपा ठेव अशी प्रार्थना केली.
पाली आणि भुतीवली आदिवासी वाडी या लोकांचे स्थलांतरण करून लघुपाटबंधारे प्रकल्प बांधण्यात आला होता. 2004मध्ये धरणाच्या जलाशयात पाणी साठू लागले आणि तेंव्हापासून धरणातील पाण्याचे पूजन स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते होऊ लागले. ज्येष्ठ नागरिक प्रा पुंडलिक गायकर यांच्या हस्ते जलपूजन केले. ग्रामस्थांनी दरवर्षीप्रमाणे त्यांच्या प्रथेप्रमाणे त्यांनी जलपुजन केले. त्यावेळी माजी उप सरपंच सचिन गायकर, प्रदीप गायकर पोलीस पाटील यांचेसह रामचंद्र पिरकर, सखाराम पिरकर, रमेश पारधी, प्रतीक गायकर, कमलाकर पारधी, भालचंद्र गायकर, हरी पिरकर, मंगेश गायकर, सौरभ गायकर, सोमनाथ गायकर, भास्कर गायकर, सारिता मंगेश गायकर उपस्थित होते.