सामना जिंकून इतिहास रचण्याची मोठी संधी
। मोहाली । वृत्तसंस्था ।
आजपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेमधील पहिला सामना पार पडणार आहे. दोन्ही संघ मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये दोन हात करणार आहे. रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल टीम इंडियाची कॅप्टन्सीची सुत्रं सांभाळणार आहे. तर पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाची कॅप्टन्सी करणार आहे. भारतीय संघाला हा सामना जिंकून इतिहास रचण्याची मोठी संधी आहे. हा सामना जिंकल्यास टीम इंडियाच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद होईल.
भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी भारतीय संघाला हा सामना जिंकून आयसीसी एकदिवसीय रँकिंगमध्ये पाकिस्तानला मागे टाकून नंबर १ होण्याची संधी आहे. यासह भारतीय संघ टी-20, वनडे आणि कसोटी या तिन्ही प्रकारत नंबर 1 टीम होण्याचा बहुमान मिळवेल. त्यामुळे टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला सामना हा अतिशय महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा असणार आहे.
आयसीसी एकदिवसीय रँकिंग ताज्या आकडेवारीनुसार, आयसीसी वनडे टीम रँकिंगमध्ये पाकिस्तान अव्वल स्थानी आहे. पाकिस्तानचे 27 सामन्यात 115 रेटिंग पॉइंट्स आहेत. तर भारतीय संघाच्या नावावर 41 एकदिवसीय सामन्यांमध्ये 115 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. ऑस्ट्रेलिया टीम तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. ऑस्ट्रेलियाचे 28 सामन्यांमध्ये 113 रेटिंग्स पॉइंट्स आहे. तर त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या स्थानी अनुक्रमे दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड टीम आहे.
पहिल्या 2 सामन्यासाठी टीम इंडिया केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा.