महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे व्यवसाय हटविण्याचे आदेश
| उरण | वार्ताहर |
घारापुरी बेटावरील 83 स्थानिक ग्रामस्थांचे व्यवसाय संकटात आले आहेत. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या अधिकार्यांनी आठ दिवसांत हे व्यवसाय हटविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 50 वर्षांपासून व्यवसाय करणार्या स्थानिक ग्रामस्थांना रोजीरोटीला मुकावे लागणार आहे. या आदेशामुळे स्थानिक गरीब व्यावसायिकांवर उपासमारीचे संकट येऊन ठेपण्याची भीती निर्माण झाल्याने बेटावरील 83 कुटुंबीयांवर चिंतेचे वातावरण पसरले आहे.
एलिफंटा बेटावर महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या अखत्यारीत शेतबंदर जेट्टीपासून एक किमी अंतरापर्यंतच्या पोहोच मार्गापर्यंत 83 स्थानिक व्यावसायिकांची कटलरीची दुकाने आहेत. मागील 50 वर्षांपासून हे स्थानिक गरीब व्यावसायिक छोटी-छोटी दुकाने थाटून चणे-फुटाणे, मके, विविध प्रकारच्या रंगीबेरंगी टोप्या, शोभिवंत वस्तू, कटलरी सामान, खाद्य पदार्थ विक्री करून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत आहेत.
महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या अखत्यारीतील जागा असल्याने भुईभाडे लागू करण्याची अनेक वर्षांपासून या व्यावसायिकांची मागणी आहे. मात्र मेरिटाइम बोर्डाच्या अधिकार्यांकडून व्यावसायिकांच्या या रास्त मागणीकडे सातत्याने जाणीवपूर्वक दुर्लक्षच केले जात आहे. बेटावर पर्यटक आधारित पिढीजात व्यवसाय करणार्या बेटावरील या स्थानिक व्यावसायिकांना उपजिविकेचे अन्य कोणतेही साधन नाही. त्यामुळे या स्थानिक गरीब व्यावसायिकांवर कोणत्याही प्रकारे उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्यासाठी घारापुरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागील काही वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत.
पर्यटक आधारित पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करणार्या बेटावरील या स्थानिक व्यावसायिकांना उपजीविकेचे अन्य कोणतेही साधन नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने खासदार निधीतून बेटावरील या 83 गरीब व्यावसायिकांना व्यवसाय करीत असलेल्या ठिकाणीच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सुंदर, सुशोभित आणि एकसारखी दिसणारी एकाच आकाराची दुकाने तयार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. आराखडा तयार करून दिलेला प्रस्ताव ग्रामपंचायतीने मंजुरीसाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडे पाठविण्यात आला होता. मात्र ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मेरिटाइम बोर्डाकडे पाठविण्यात आलेला प्रस्ताव अद्यापही मंजुरीसाठी प्रलंबित आहे.
महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे ठाणे प्रादेशिक बंदर विभागाचे अधिकारी कॅप्टन सूरज नाईक यांनी संबंधित 83 व्यावसायिकांनाही चर्चा करण्यासाठी ठाणे कार्यालयात पाचारण केले होते. या बैठकीत राजकीय दबावाखाली असलेल्या अधिकार्यांनी व्यावसायिकांचे म्हणणे ऐकून न घेताच आठ दिवसात दुकाने हटविण्याचे धमकीवजा आदेशच दिले असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. गरिबांवर येऊ घातलेले उपासमारीचे संकट दूर करण्यासाठी या 83 व्यावसायिकांनी पत्राद्वारे घारापुरी ग्रामपंचायतीलाच यातून मार्ग काढण्याची विनंती केली आहे.