| पनवेल | वार्ताहर |
माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत पर्यावरण संवर्धन व संरक्षण याचे महत्त्व शालेय स्तरावर बाल वयात विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीद्वारे बिंबवण्यासाठी शासन निर्णयाद्वारे राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये ‘पर्यावरण सेवा योजना’ पनवेल महापालिकेच्यावतीने राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच महापालिका क्षेत्रातील 25 माध्यमिक शाळांच्या प्रतिनिधींची बैठक उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयात पार पडली. यावेळी पर्यावरण विभागाचे विभागप्रमुख मनोज चव्हाण, शिक्षण विभागाच्या अधीक्षक कीर्ती महाजन, तसेच महापालिका कार्यक्षेत्रातील 25 शाळांमधील शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थित शिक्षकांना पर्यावरण सेवा योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली.
दिवसेंदिवस पर्यावरणाचा होणारा र्हास लक्षात घेता नागरिकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृती आणि त्याद्वारे पर्यावरण जतन करण्याची प्रेरणा जागृत करणे ही काळाजी गरज आहे. यासाठी शासनाच्यावतीने ‘पर्यावरण सेवा योजना’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक पर्यावरणाशी निगडित समस्या प्रत्यक्ष सहभाग व कृतीच्या आधारे समजून घेऊन त्यावर उपाययोजना करणे. तसेच निसर्ग व मानव यांच्यातील नातेसंबंध समजून ते बालवयात बिंबविणे हे पर्यावरण सेवा योजनेचे उद्देश आहे. स्थानिक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृती, प्रतिनिधित्व व संवाद कौशल्य विकसित करून पर्यावरण संवर्धनासाठी नेतृत्वगुण विकसित करण्याच्यादृष्टीने महापालिका ‘पर्यावरण सेवा योजना’ राबवीत आहे. या योजनेंतर्गत शासनमान्य शाळांमधील योजना प्रमुख शिक्षकांची निवड करून शाळा नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण केली जाणार आहे. या योजनेसाठी प्रत्येक शाळेमध्ये 50 विद्यार्थ्यांचा गट स्थापन करून उपक्रम पूर्ण केले जाणार आहेत. पर्यावरण सेवा योजनेंतर्गत आकाश, जल, वायू, भूमी, अग्नी या माझी वसुंधरा अभियानातील महत्त्वाच्या घटकांनुसार कृती कार्यक्रम, शिबिरे, व्याख्याने, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, वृक्षारोपण, प्रश्न मंजुषांचे आयोजन करण्यात येणार आहे.