। चिरनेर । वार्ताहर ।
उरण तालुक्यात चिरनेर जंगल सत्याग्रहाचा हुतात्मा स्मृती दिन साजरा करण्या संदर्भात नुकतीच चिरनेर ग्रामपंचायत कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. सदर बैठकीचे अध्यक्षस्थान सरपंच संतोष चिर्लेकर यांनी भुषविले होते. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 91वा स्मृतिदिन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
1930 च्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात या हेतूने चिरनेर येथील हुतात्मा स्मृतीस्तंभ समोर दरवर्षी दि.25 सप्टेंबर रोजी चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी शासकीय मानवंदना म्हणून चिरनेर ग्रामपंचायत प्रशासन, उरण पंचायत समिती, रायगड जिल्हा परिषद आणि नवी मुंबई पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. परंतु, यावर्षी चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या 91 व्या हुतात्मा स्मृती दिन कार्यक्रमावर कोरोनाचे सावट असल्याचे दिसून येत आहे. महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. त्या चळवळीला पाठिंबा देत उरण मधील शेतकर्यांनीही आपल्या जीवाची पर्वा न करता सत्याग्रह करून इंग्रजांप्रती आपला रोष व्यक्त केला होता. यावेळी हुतात्मा झालेल्या शूरविरांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात या उद्देशाने चिरनेर येथील हुतात्मा स्मृतीस्तंभासमोर दरवर्षी दि.25 सप्टेंबरला चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या स्मृती दिन कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात व मान्यवरांच्या उपस्थितीत हुतात्म्यांना शासकीय मानवंदना म्हणून आयोजन करण्यात येते. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिरनेर जंगल सत्याग्रहचा 91 वा स्मृती दिन कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यावेळी राजिपचे सदस्य बाजीराव परदेशी, उरणच्या सभापती शुभांगी पाटील, शेकापचे चिटणीस सुरेश पाटील, पोलिस पाटील संजय पाटील, ग्रामपंचायतींच्या सदस्या सविता केणी, शितल घबाडी, संध्या ठाकूर, ग्रामविकास अधिकारी महेश पवार, ग्रामपंचायतीचे सदस्य रमेश फोफेरकर, किरण कुंभार, धनेश ठाकूर, प्रतिमा मोकल, सामाजिक कार्यकर्ते सचिन घबाडी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.