| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत कल्याण रस्त्यावर शेलू गावाच्या हद्दीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला गेली काही महिने सातत्याने प्लास्टिक पिशव्यांचा कचरा टाकून दिला जात आहे. कर्जत तालुक्यात स्वागत रस्त्याच्या आजूबाजूला पडलेल्या प्लास्टिक पिशव्या करताना दिसत आहेत. दरम्यान या सर्व कचऱ्याबाबत शेलू ग्रामपंचायत प्रशासन ढिम्म असल्याचे दिसून येत आहे.
शेलू ग्रामपंचायत मधील कचरा हा ग्रामपंचायतीकडून दररोज उचलला जातो आणि तो कचरा डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात येतो. कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर शेलू गावाच्या प्रवेश मार्गापासून पुढे साधारण 150 मीटर रस्त्याच्या आजूबाजूला प्लास्टिक कचऱ्याचे ढीग आढळून येत आहेत. हा कचरा शेलू ग्रामपंचायतीकडून आणून टाकण्यात येत नसल्याचे मावळते सरपंच शिवाजी खारीक यांचे म्हणणे आहे. मग त्या भागात अस्ताव्यस्त पडून असलेला कचरा कोणत्या व्यक्तीकडून टाकण्यात येतो. याबद्दल सध्या कोणालाही कोणतीही माहिती नाही. प्लास्टिक पिशव्यांच्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
कचरा टाकणाऱ्या व्यक्ती विरुद्ध कारवाई करायला शेलू ग्रामपंचायत प्रशासनाला वेळ नाही. ग्रामपंचायतीकडून तेथे कचरा टाकला जाऊ नये अशी कोणतीही फलकबाजी करण्यात आलेली नाही. त्याचवेळी या ग्रामपंचायतीमधील प्रशासक यांच्याकडून एकदाही संबंधितांवर कारवाई व्हावी असा प्रयत्न केला गेला नाही. प्लास्टिक पिशव्यांचा कचरा पाडण्याचे प्रमाण वाढले आहे. बेकायदा प्लास्टिक पिशव्यांचा आणि कचरा टाकणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीकडून सीसीटीव्ही कॅमऱ्यांचे जाळे बसविण्याची गरज आहे, असे असे अर्जुन तरे यांनी सांगितले.