अनंत गीतेंसह अन्य उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात
| रायगड | खास प्रतिनिधी |
लोकसभा निवडणुकीच्या तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या. मंगळवारी (दि.7) मे रोजी सकाळी सात ते सांयकाळी सहा या वेळेत मतदान पार पडणार आहे. इंडिया आघाडीतील शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते आणि महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) सुनील तटकरे यांच्यामध्येच थेट लढत होत आहे. गेल्या 15 दिवसांपासून सुरु असलेल्या प्रचाराच्या रणांगणावर नजर फिरवल्यास रायगड-रत्नागिरीमधील मतदार तटकरेंना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते.
रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये अलिबाग, पेण, महाड आणि श्रीवर्धन मतदारसंघ आहेत. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि दापोली या मतदारसंघाचादेखील समावेश होतो. तटकरे यांच्या बाजूने भाजपाने पूर्ण शक्ती पणाला लावली. तटकरेंकडे पेणचे भाजपाचे आमदार रवींद्र पाटील, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, महाड शिवसेनेचे आमदार भरत गोगावले दोघेही शिवसेना (शिंदे गट) तसेच श्रीवर्धनच्या आमदार तथा मंत्री आदिती तटकरे आणि तटकरे स्वतः खासदार आहेत. असे असले तरी, तटकरेंनी ज्या शिंदे गटाची मदत घेतली आहे, त्या आमदारांवर माजी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी गद्दारीचा शिक्का मारला आहे. त्यामुळे मतदारांची सहानुभूती ही शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांच्यासोबत असल्याचे सर्वांनीच पाहिले आहे. त्याचप्रमाणे तटकरे हे भ्रष्टाचारातून मुक्तता मिळवण्यासाठी भाजपाच्या मांडीवर जाऊन बसले. यासाठी त्यांनी शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची चर्चा गल्लीबोळात होत आहे. त्यामुळे जनता कमालीची नाराज आहे. तटकरेंना मत म्हणजे मोदींना मत, असे भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेण येथील जाहीर सभेत वक्तव्य केल्याने मराठा, ओबीसी, दलित आणि मुस्लीम मतदारांमध्ये मोदींविरोधातील खदखद अजून बाहेर आली. देशभरात मोदींवर आता कोणाचा फारसा विश्वास राहिलेला नाही. तटकरेंना मत म्हणजे मोदींना मत हेच फडणवीस यांचे स्टेटमेंट बूमरँग होणार असल्याचे बोलले जाते.
तटकरेंनी आपल्या भाषणात नेहमीच सांगितले आहे की, निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळामध्ये रायगड-रत्नागिरी जनतेला मदत केली. वादळानंतर लगेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रायगडमध्ये पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांनी तातडीने 100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. त्यानंतरही महाविकास आघाडी सरकारने मदतीचा ओघ सुरुच ठेवला होता आणि तीच मदत तटकरे यांनी वाटली. कोणतेही सरकार असो. जनतेवर आलेले संकट दूर करणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य आणि जबाबदारी आहे. त्यामुळे कोणीही नेता खिशातून मदत करत नाही, हेदेखील जनता विसरत नाही.
गीते हे स्वच्छ चारित्र्याचे नेते आहेत. 35 वर्षांत ते मंत्री, खासदार असताना एकही भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर झालेला नाही. त्यामुळे मतदारांना ते आकर्षित करण्यात यशस्वी झाल्याचे प्रचार सभेतील गर्दीवरुन दिसून येते. उद्धव ठाकरे यांनी कडवे हिंदुत्व बाजूला सारत राष्ट्रीयत्व हेच हिंदुत्व असे सांगितले. त्यामुळे सर्व धर्मातील विशेषतः मुस्लिम मतदारांमध्ये एक आपुलकीचा विश्वास निर्माण करण्यास ठाकरे यांना यश आले. त्याचा फायदा हा थेट मतपेटीतून गीते यांना होणार हे कोणीच नाकारु शकणार नाही. गीतेंच्या सोबतीला शेकापच्या जयंत पाटील यांचा भक्कम पाठिंबा आहे, तसेच काँग्रेसही गीतेंना विजयी करण्यासाठी पुढे सरसावली आहे. या गीतेंच्या जमेच्या बाजू आहेत. गुहागरमधून आमदार भास्कर जाधव यांची जोडदेखील गीतेंना मिळणार असल्याने गीतेंचा विजय हा नजरेच्या टप्प्यात आल्याचे दिसते.