ठेकेदार, शासकीय अधिकारी मालामाल
। उरण । वार्ताहर ।
जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर दरवर्षी मान्सूनपूर्व कामांवर दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र, प्रत्यक्षात कामे न होताच बिले मंजूर केली जात आहेत. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. या मान्सूनपूर्व कामांत महाघोटाळा होत असून त्यामध्ये ठेकेदार व शासकीय अधिकारी मालामाल होत आहेत.
उरण तालुक्यात पावसाळा सुरुवात होण्यापूर्वी एक दीड महिना आधीपासूनच नालेसफाईची कामे सुरू केली जातात. उरण परिसरात अनेक ठिकाणी भरावाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. भराव करीत असताना जी पाणी जाण्याची नैसर्गिक स्तोत्र आहेत ती भरावाखाली गाडली गेली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा कसा होईल, याचा सारासार विचार प्रशासन करताना दिसत नाही. याचा त्रास सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. मे महिन्याच्या शेवटी मान्सूनपूर्व कामे पूर्ण करणे बंधनकारक असतानाही उरण परिसरात अशी कामे सुरू असल्याचे दिसत नाही. अधिकारी वर्गाकडे विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देतात. असा अनुभव प्रत्येक वर्षी येत आहे. संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांचे संगनमत असते, कारण दरवर्षीच तेच तेच ठेकेदार कामांचा मात्र झोल असतो.
आजच्या घडीला मान्सूनपूर्व कामे सुरू असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु, त्यातील 20% कामे ही पावसाळा काही दिवसांवर आला असताना ही पूर्णत्वास जाताना दिसत नाही. उलट काम न करताच काम पूर्ण झाल्याचे दाखवून बिले अधिकारी वर्गाकडून आर्थिक सबंधातून पास केली जात असल्याचे समजते. नालेसफाईचे बिल घेतल्यानंतर पुन्हा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुन्हा त्याच कामांचे बिल पास केले जात असल्याचे ग्रामपंचायतच्या काही सदस्यांनी सांगितले. मान्सूनपूर्व कामांचे दोनदा बिले काढूनही परिस्थिती जैसे थे असल्याचा प्रत्यय पावसाळ्यात आम जनतेला येत आहे. दरवर्षी निघणार्या मान्सूनपूर्व कामांची सखोल चौकशी केली तर नक्कीच महाघोटाळा उघडकीस येऊन शासकीय अधिकारी व ठेकेदार मालामाल झाल्याचे उघड होईल. तरी मान्सूनपूर्व कामांची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.