। उरण । वार्ताहर ।
करंजा टर्मिनल अँड लॉजिस्टिक प्रा. लि कंपनी (जेट्टी) करंजा येथून खाडीमधून इंडो एनर्जी यांच्या माध्यमातून दिवसरात्र मालवाहतूक जहाजमधून लाखो टन कोळसा उतरवला जातो आहे. त्यानंतर या जेट्टीतून हा माल दुसरीकडे पाठविला जात आहे. यामुळे या परिसरातील मच्छीमार संकटात सापडला आहे.
या कोळशाच्या समुद्रामार्गी वाहतूकीबाबत मच्छिमार मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेले असता, त्यांना हा गंभीर प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी संस्थेत येऊन याची माहिती दिली. कोळसा हा ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे तो समुद्रात पडल्यास त्या परिसरातील जल प्रदूषण होऊन मासे तेथून लांब जात असतात. तसेच कोळसा हा सहज विघटन न होणारा असल्यामुळे कोळसा व समुद्राचे खारे पाणी यांचे अपघटन होऊन विषारी रसायन तयार होते. त्यामुळे करंजा खाडीतील सागरी जैवविविधता व जलचरांचा नैसर्गिक अधिवास पूर्णत: नष्ट होणार आहे. या आधीच सदर कंपनीने भर समुद्रात लाखो ब्रास दगड-मातीचा भराव करून खारफुटीची कत्तल केली आहे. यामुळे हजारो मच्छिमारांच्या कुटूंबावर संकट कोसळले आहे. जिल्ह्यातील एकमेव सुरक्षित असणारी करंजा खाडी या कोळश्याच्या वाहतूकीमुळे उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे हजारो मच्छिमार कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच कंपनीच्या मालवाहू जहाजांना महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने चॅनल नोटीफाय निर्धारित न केल्याने या मालवाहू जहाजांनी मच्छिमारांच्या जाळ्यांचे सुद्धा मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे मच्छिमार दोन्ही बाजूंनी भरडला जाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर पर्यावरणाला घातक असणारी कोळसा वाहतूक बंद करावी, अन्यथा याचे तीव्र पडसाद आगामी काळामध्ये उमटल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा करंजा मच्छिमार वि. का. सहकारी सोसायटी लि. चे संचालक हेमंत गौरीकर यांनी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.