| चिपळूण | प्रतिनिधी |
15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी देशाचा राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने फडकवला जातो. मात्र, हाच राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर, कचरापेटीत, गटारात व अन्यत्र फाटलेल्या अवस्थेत आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्ट न झाल्याने या राष्ट्र्र्रध्वजांची विटंबना अनेक दिवस पहावी लागते. राष्ट्रध्वजाची ही विटंबना रोखण्यासाठी पोलिसांनी बंदी घातलेले प्लास्टिकचे ध्वज विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले.
‘झंडा उँचा रहे हमारा’, असे अभिमानाने म्हटले जाते. परंतु, त्याचवेळी लहान मुलांच्या हट्टापोटी खेळण्यासाठी घेतलेले किंवा वाहनांवर लावण्यासाठी घेतलेले कागदी आणि प्लास्टिकचे झेंडे रस्त्यावर पडलेले पहायला मिळतात. त्याने राष्ट्रध्वजाचा घोर अवमान होत आहे. क्रांतिकारकांनी जो ध्वज भूमीवर पडू नये, यासाठी लाठ्या खाल्ल्या, वेळप्रसंगी प्राणाचेही बलिदान दिले, त्यांच्या बलिदानाची ही क्रूर चेष्टाच नव्हे का? राष्ट्रध्वजाचा मान राखणे, हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे यावेळी समितीच्यावतीने निवेदनात जनतेलाही आवाहन करण्यात आले आहे आहे.






