। रेवदंडा । प्रतिनिधी ।
जिल्ह्यातील संवेदनशील भागांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुढील दोन महिन्यांसाठी रायगड जिल्ह्यात पोलीस विभागाची पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यास बंदीचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत.
पोलीस अधीक्षकांच्या अहवालानुसार, रायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था तसेच समुद्रालगतचे भाग हे दहशतवादी कारवायांसाठी अत्यंत संवेदनशील मानले जातात. याआधी देशातील विविध भागांत दहशतवादी आणि विघातक कारवायांसाठी ड्रोनचा वापर झाल्याची उदाहरणे आहेत. रायगडमध्ये रात्रीच्या वेळी अनधिकृत ड्रोन उडवल्याच्या तक्रारी पोलीसांकडे नोंदवल्या गेल्या असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ड्रोनद्वारे टेहळणी करून दहशतवादी हल्ले घडवून आणण्याची शक्यता, चोरी व अन्य गुन्ह्यांसाठी माहिती संकलन होण्याचा धोका, तसेच ड्रोनवरून केलेले चित्रिकरण विघातक कृत्यांसाठी वापरले जाण्याचा अंदाज लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी हे आदेश जारी केले आहेत. पुढील काळात कोणीही ड्रोनचा वापर करायचा असल्यास 7 दिवसांपूर्वी संबंधित पोलीस ठाण्यात अर्ज करून परवानगी घेणे बंधनकारक राहील. मात्र, या आदेशांच्या पार्श्वभूमीवर रेवदंडा आगरकोट किल्ला, रेवदंडा बीच आणि रेवदंडासाळाव ब्रिज परिसरात अनधिकृतपणे ड्रोन उडवले जात असल्याचे गंभीर आरोप नागरिक, पर्यटक व शिवप्रेमींनी केले आहेत.







