रत्नदीप पाटलांचा दणदणीत विजय
| पनवेल | भरतकुमार कांबळे |
पनवेल वकील बार असोसिएशनच्या त्रैवार्षिक निवडणुकीमध्ये चौकार मारण्याच्या तयारीत असलेले पनवेल महानगरपालिकेचे भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक आणि बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. मनोज भुजबळ यांची सत्ता खालसा करत ॲड. रत्नदीप पाटील यांनी विजय संपादित केला. या निवडणुकीत विजय प्राप्त केल्यानंतर ॲड. रत्नदीप पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात जाऊन माजी आमदार बाळाराम पाटील यांची सदिच्छा भेट घेतली आणि पुढील वाटचालीस आशीर्वाद घेतले.
पनवेल वकील बार असोसिएशनची निवडणूक कोणाच्याही दबावाला बळी न पडता रत्नदीप पाटील यांनी खूप गंभीरपणे घेतली. सरकारी वकील वाय.एस. भोपी यांनी नैतिकतेचा आरसा आणि सत्यमेव जयतेचा निनाद करून ॲड. प्रफुल्ल म्हात्रे, ॲड. गजानन पाटील, ॲड. जी.आर. कडव, ॲड. डी.एन. गोंधळी यांनी मेहनत घेतल्यामुळे ॲड. रत्नदीप पाटील यांच्याकडे विजयाचे पारडे झुकले.
नुकत्याच पार पडलेल्या पनवेल न्यायालयातील वकील बार असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी विशेष लक्ष घालून ॲड. मनोज भुजबळ यांना पुन्हा अध्यक्षपदी निवडून आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. निवडणुकीच्या तोंडावर अधिवक्ता परिषदेचे आयोजन करून राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांना बोलावून निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तसेच पनवेलमधील वकिलांना स्वतः फोन करून त्यांच्यावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला. राजकारणापासून नेहमीच दूर राहिलेले रत्नदीप पाटील यांना हलक्यात घेणे मनोज भुजबळ यांना खूप महागात पडले, तसेच येथे ईएमची जादू चालत नसल्याने त्यांचे काही चालले नाही. या निवडणुकीच्या निकालानंतर पनवेलमध्ये येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकीमध्येसुद्धा असेच चित्र दिसेल अशी चर्चा नागरिक करताना दिसत आहेत.
या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. एच.जे. शेळके यांनी सक्षमपणे काम करत असताना त्यांना ॲड. राजेश पाटील, ॲड. जगदीश म्हात्रे, ॲड. कुंभार आदी वकिलांची साथ मिळाली. शेळके यांनी या निवडणुकीमध्ये कणखर भूमिका बजावत चार टेंडर वोटिंग मतमोजणी घेण्यास नकार दिला. त्यांनी बोगस दाखला प्रकरणात अटकेत असलेले ॲड. नितीन केळकर यांना निवडणुकीच्या मतदानापासून अटकाव केला. यावेळी त्यांनी सांगितले की, यांना मतदान करण्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक आहे, यामुळे ॲड. नितीन केळकर यांना मतदान करता आले नाही आणि भुजबळ आणि कंपोजच्या मेहनतीवर पाणी फिरले गेले.
ॲड. रत्नदीप पाटील यांच्या समूहाने निवडणुकीच्या दिवशी न्यायालय परिसरात दक्ष राहून परप्रांतीय वकील, कर्जत, नवी मुंबई, ठाणे आणि उरण वकील बार असोसिएशन निवडणुकीत दोन वर्षांच्या आत मतदान केलेल्या आणि येथे दुबार मतदार करून पाहणाऱ्या वकिलांना अटकाव केला. यामुळेच रत्नागिरी पाटील यांचा विजयरथ 28 मतांची आघाडी घेऊ शकला. याचाच अर्थ असा की, ही निवडणूक धनदौलतीने जिंकता येत नाही, हे स्पष्ट दिसून आले.







