। सुकेळी । वार्ताहर ।
महामार्गावरील वाकण जवळील अंबा नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलावरुन काही महिन्यांपूर्वी वाहतुक सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही पुलावरुन वाहनांची वर्दळ वेगाने सुरु आहे. तसेच आमडोशी मार्गे रोहाकडे देखील याच ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वाहने जात आहेत. त्यामुळे चारही बाजुकडुन वाहनांची रहदारी वेगाने सुरु आहे. त्यातच या ठिकाणी एकही गतिरोधक नसल्यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यावरुन वाहनांचा वेग देखिल वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडताना वाहनांची धडक बसुन अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच याच ठिकाणी पोलिस चौकी असल्यामुळे तेथे ड्युटी बजावत असलेल्या पोलिस कर्मचार्यांना देखील जीव मुठीत घेऊन ड्युटी करावी लागत आहे. तरी संबंधित कंपनीने या ठिकाणी लवकरात लवकर गतिरोधक बसवावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.