| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
आजचा दिवस खऱ्या अर्थाने एक वेगळ्या स्वरुपाचा व आनंद देणारा आहे. इतकी वर्षे सातत्य राखणे सोपे नाही. प्रशांत नाईक यांनी आपल्या कर्तृत्वाने पक्षाला विजय मिळूवन दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाला सलाम आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील शेकाप व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून देऊन काम केले आहे. सर्वांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हा विजय मिळाला आहे. नगरपरिषदेचा कारभार आजपर्यंत स्वच्छ व पारदर्शक राहिला आहे, असेच आगामी काळातदेखील काम राहील, असा विश्वास आहे. सुप्रिया पाटील यांच्या रुपाने एक नंबरची सासू मिळाली आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, अशा अनेक क्षेत्रात चढ-उतार पाहिले आहेत. मात्र, खचून न जाता, दुसऱ्या दिवशी पुन्हा जोमाने काम करण्यास सुरुवात केली. शेकापचे नेते जयंत पाटील यांनी सक्षम राहण्यास शिकवले. अलिबाग तालुक्यासह मुरूड, रोहा तालुक्यात शिंदे गटाकडून घाणेरडे राजकारण केले जात होते. या नगरपरिषद निवडणुकांमधून जनतेने उत्तर दिले आहे. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीसाठी विजयाचा नारळ फुटला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून या निवडणुकीत एक वेगळा इतिहास घडवूया, रायगड जिल्हा परिषदेच्या जास्तीत जास्त जागांवर आपले वर्चस्व ठेवण्यासाठी आतापासूनच काम करूया, असे आवाहन शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.
अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या महाविकास आघाडीतील शेकाप-काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार सोहळा शेतकरी भवन येथील सभागृहात पार पडला. निमित्त अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील व शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या वाढदिवसाचे. शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.







