मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील एसटी कामगारांचा संप भडकवला जात आहे. राजकीय पोळी भाजा पण पोळी करपणार नाही याची काळजी घ्या. असा टोला परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपला लगावला.
एसटी संघटनांच्या प्रतिनिधींनी मला राज्याच्या महाधिवक्त्याशी चर्चा करायला सांगितले आहे. कर्मचार्यांनी संप मागे घेतला तर महाधिवक्त्यांशी चर्चा करेन अशी सामोपचाराची भूमिका परब यांनी घेतली.मात्र विलीनीकरणाचा मुद्दा सोडून कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. विलीनीकरणाबाबत समितीचा अहवाल आल्यावरच निर्णय घेता येईल, असे अ परब यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
रविवारी एसटी संघटनेचे पदाधिकारी गुजर आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी परब यांची भेट घेऊन एसटी कामगारांच्या प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर माध्यमांसोबत बोलताना परब म्हणाले, विलीनीकरणाबाबत उच्च न्यायालयाच्या समितीला पूर्ण अधिकार दिले आहेत. न्यायालयाने निर्णय दिलेले असताना त्यात फेरफार करता येणार नाही. समितीचा जो काही अहवाल असेल त्यावर आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ.
लोकांची अडवणूक होते, त्यांना त्रास होत आहे. विलीनीकरणाची प्रक्रिया एक- दोन तीन दिवसांत होत नाही. त्यासाठी कमिटीला योग्य तो वेळ दिला आहे. त्या व्यतिरिक्त काही मुद्दे असतील तर चर्चा करायला तयार आहोत.
-अनिल परब, परिवहनमंत्री