गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दार खुले; 3 हजार 146 विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत (आरटीई) 25 टक्के प्रवेश सुरु करण्यात आल आहे. या प्रवेशासाठी रायगड जिल्ह्यातील 269 शाळांची निवड करण्यात आली असून, 3 हजार 146 विद्यार्थ्यांना या नियमाप्रमाणे प्रवेश मिळणार आहे. त्यासाठी स्वयं अर्थसहाय्यित शाळा व विना अनुदानित शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे.
अर्ज भरण्याची प्रक्रिया 17 फेब्रुवारी ते 10 मार्च या कालावधीत सुरू असणार आहे. पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर अर्ज भरायचे आहेत. आरटीई अंतर्गत दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा व विना अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. वंचित घटकांतील बालकांमध्ये अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), (क), (ड) इतर मागासवर्ग (ओबीसी), विशेष मागासवर्ग (एसबीसी), आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटक, एचआयव्ही बाधित किंवा प्रभावित बालक, अनाथ बालके, दिव्यांग बालके अथवा कोविड प्रभावित बालकांचा समावेश होतो. आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे, अशा बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो. बालकांच्या पालकांना त्यांच्या निवासस्थानाच्या ठिकाणापासून एक किलो मीटरपेक्षा कमी अंतरावरील शाळा आरटीई पोर्टलवर दिसतील. या अनुषंगाने प्रक्रियेकरिता विचारपूर्वक 10 शाळांची निवड करण्यात यावी, इत्यादी सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी रायगड जिल्ह्यातील एकूण 269 शाळांची आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 3 हजार 146 विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळणार आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी केले आहे.
अर्ज भरताना ही प्रक्रिया राबवावी
अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे जोडण्यात यावीत, अचूक माहिती भरण्यात यावी, तसेच विहित मुदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल, याची दक्षता घ्यावी. प्रवेश प्रक्रियेदरम्यान काही समस्या असल्यास आरटीई पोर्टलवर मदत केंद्रांची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्याशी संपर्क करुन समस्येचे निराकरण करता येईल, असे शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.







