| नागोठणे | प्रतिनीधी |
जिल्ह्यातील महत्वाची समजल्या जाणाऱ्या नागोठणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 6 मधील सदस्य असलेले जनसेवा विकास आघाडीचे ज्ञानेश्वर साळुंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नागोठणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच अखलाक पानसरे यांनी आपला अडीच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण करून आघाडीतील अंतर्गत तडजोडीनुसार काही दिवसांपूर्वी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी ही निवड करण्यात आली.
उपसरपंच निवडीसाठी नागोठणे ग्रामपंचायतीच्या कै. शैलेंद्र देशपांडे सभागृहात नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रियाताई महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत उपसरपंच पदाचे दुसरे उमेदवार व प्रभाग क्रमांक 5 मधील सदस्य प्रकाश कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ज्ञानेश्वर साळुंखे यांची बिनविरोध निवड झाली. ज्ञानेश्वर साळुंखे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर होताच आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नागोठणे ग्रामपंचायतीच्या स्व. बाळासाहेब ठाकरे ग्रामसचिवालयाच्या बाहेर फटाक्यांची आतषबाजी करून व पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला.
उपसरपंच पदाच्या निवडणुकीच्या प्रसंगी ज्येष्ठ नेते संजयदादा महाडिक, पहिले लोकनियुक्त सरपंच तथा विद्यमान सदस्य डॉ. मिलिंद धात्रक, ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे, मावळते उपसरपंच अकलाख पानसरे, सदस्य संतोष नागोठणेकर, सचिन ठोंबरे, प्रकाश कांबळे, शबाना मुल्ला, पूनम काळे, सुप्रिया काकडे, भाविका गिजे, अमृता महाडिक, ज्योती राऊत, सुलताना लंबाते, जन्नत कुरेशी, विनिता पाटील, शहानाज अधिकारी, मंगी कातकरी, संजय काकडे, भरत गिजे, अनिल महाडिक, सुनील लाड, बंटी मांडे, अजित दळवी, मच्छिंद्र साळुंखे, संकेत साळुंखे, सोनाली साळुंखे, बबलू खंडागळे, रुपेश नागोठणेकर, अल्वीन नाकते आदींसह प्रभाग क्रमांक 6 चा समावेश असलेल्या जोगेश्वरी नगर, शांती नगर, रामनगर येथील कार्यकर्ते व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे यांना सरपंच सुप्रियाताई महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी उपसरपंच अखलाक पानसरे यांच्याकडून उपसरपंच पदाच्या खुर्चीवर विराजमान करण्यात आले. यावेळी सरपंच सुप्रियाताई महाडिक व माजी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, माजी उपसरपंच अखलाक पानसरे, संजयदादा महाडिक यांच्यासह अनेक मान्यवरांनी व उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. तसेच आपल्या उपसरपंच पदाच्या काळात गावातील विकासकामांसाठी सर्वोतोपरी योगदान देण्याचा आपण प्रयत्न करू असे अभिवचन यावेळी उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे यांनी दिले.







