ममता बॅनजी यांचे प्रतिपादन
मुंबई दौर्यात शिवेसेनेच्या नेत्यांसह चर्चा
। मुंबई । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्रात ज्याप्रमाणे भाजपचे कार्यकर्ते सीबीआय, एनसीबी, ईडी अशा सरकारी तपास यंत्रणांमार्फत दहशतवाद निर्माण करत आहेत, तसाच तो पश्चिम बंगालमध्येही करत आहेत. पण भाजपच्या सरकारी दहशतवाद्यांना आम्ही पुरुन उरलो असल्याचे प्रतिपादन प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
ममता बॅनर्जी दोन दिवसांच्या मुंबई दौर्यावर आल्या आहेत. या दौर्यात त्यांना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची होती. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव उद्धव ठाकरे यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत आणि इतर शिवसेना नेत्यांची ममत बॅनर्जी यांनी भेट घेतली. या भेटीत झालेल्या चर्चेदरम्यान ममता बॅनर्जी यांनी हे प्रतिपादन केल्याचे खा.संजय राऊत यांनी सांगितले.
सर्वप्रथम ममता बॅनर्जी यांची शिवसेनेच्या नेत्यांची भेट ही निश्चितच राजकीय हेतूने होती, हे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींविषयी दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली असून भविष्यातील रणनीतीदेखील विचारात घेतली गेली, अशी माहिती राऊत यांनी दिली.
याशिवाय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रियेनंतर त्यांना सध्या तरी भेटता येणार नाही, असे रुग्णालय प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आल्याने ममता बॅनर्जी यांची शिवसेनाप्रमुखांशी भेट होऊ शकली नाही. मात्र सिद्धीविनायक मंदिरात गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी उद्धवजींची प्रकृती लवकर ठिक व्हावी, यासाठी प्रार्थना केली, अशी माहिती राऊत यांनी दिली.
2024 मधील लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणती रणनिती आखायची यावरही दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली असून भाजपविरोधात एकत्रपणे लढण्यावर यावेळी एकमत झाले. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या अन्यायाशी, असत्याविरोधात एकत्र लढू, असे आश्वासन ममता बॅनर्जी यांनी दिले आहे.
शरद पवार यांच्याएवढी राजकीय उंची असलेल्या ममता बॅनर्जी या देशातील एकमेव नेत्या आहेत. त्यांचा राजकीय अनुभवदेखील तितकाच प्रगल्भ असल्याचे मत माध्यमांसह संवाद साधताना शिवसेना खा. संजय राऊत यांनी केले आहे.