लखीमपूर खेरी | वृत्तसंस्था |
आठ जणांचा बळी घेणार्या लखीमपूर खेरी हिंसाचारप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) 14 जणांवर आरोपपत्र दाखल केले. त्यात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष याचाही समावेश आहे. त्याच्यावर हत्या, खुनाचा प्रयत्न, प्राणघातक शस्त्रांसह दंगल माजवणे आदी गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.
या हिंसाचारातील 14 आरोपींवर 5000 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 14पैकी 13 आरोपी अटकेत आहेत. विशेष तपास पथकाने केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रा ऊर्फ मोनू याच्यासह अंकित दास, नंदनसिंह बिश्त, सत्यम त्रिपाठी, लतीफ ऊर्फ काले, शेखर भारती, सुमीत जैस्वाल, आशीष पांडे, लवकुश राणा, शिशुपाल, उल्लास कुमार ऊर्फ मोहीत त्रिवेदी, रिंकू राणा आणि धर्मेद्र बंजारा या 13 आरोपींना अटक केली आहे. तर आरोपी वीरेंद्र शुक्ला याच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे गेल्या वर्षी 3 ऑक्टोबरला शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करीत असताना त्यांच्या जथ्यात मोटार घुसवण्यात आली होती. या त्यात चार शेतकर्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता.