उमेश-निवेदिताच्या ‘मुक्या संवादा’ची बोलकी कहाणी
| राकेश लोहार | चौल |
मनातील प्रेमरुपी भावनांना व्यक्त करण्याचे मुख्य माध्यम म्हणजे संवाद. मुळात, प्रेमाचा उगमच संवादातून होतो, हेही तितकेचे खरं. परंतु, संवादाशिवाय स्पर्श अन् हावभावही प्रेम व्यक्त करण्याचे माध्यम बनू शकते, आणि त्यातूनही ‘अबोल प्रीत’ बहरास येते, याचे सुंदर उदाहरण उमेश आणि निवेदिता हे दाम्पत्य. त्यांची ‘लव्हस्टोरी’सुद्धा समाजापुढे एक आदर्श म्हणून पाहता येईल. आजच्या ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने त्यांचा हा प्रेमरुपी प्रवास…
अलिबाग तालुक्यातील भायमळा येथील अनंत पाटील यांचे पत्नी, दोन मुले आणि मुलगी असे छोटे आणि सुंदर कुटुंब. याच कुटुंबात उमेशचा जन्म झाला. म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याचप्रमाणे उमेश लहानपणापासूनच चलाख, दिसायलाही गोरागोमटा होता. त्यामुळे सर्वांचाच लाडका. आईवडिलांनाही मुलाचे कौतुक होते. परंतु, आपल्या मुलाचे ‘बोबडे बोल’ त्यांच्या नशिबात नव्हते. जन्मताच मूक (अबोल) असल्याने तो ‘आई’ किंवा ‘बाबा’ बोलू शकला नाही. परंतु, याबाबत कोणतेही दुःख न बाळगता आईवडिलांनी उमेशला चांगले शिक्षण देऊन घडविण्याचे ठरविले. कारण, शिक्षण हे कोणत्याची संकटावर म्हणा किंवा व्यंगावर मात करण्याचे प्रमुख अस्त्र आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत, की ज्यांनी शिक्षणामुळे त्यांच्या आयुष्याचा मार्ग सुकर केला आहे. शिक्षणाचे महत्त्व त्यावेळी उमेशच्या आईवडिलांनी जाणले, आणि त्याचे भविष्य घडविण्याचे ठरविले.
सुरुवातीस नागाव आणि त्यानंतर अलिबाग येथील मूकबधीर शाळेत उमेशने चौथीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. आजकाल प्रेमाची सुरुवात शालेय जीवनातच होते. मनानेच काढलेल्या चित्रांत रंग भरायला सुरुवात होते आणि हळूहळू आकर्षण वाढू लागतं. त्याची परिणती प्रेमात होते. या गोष्टीस उमेशही अपवाद नाही. कारण, उमेश ज्या शाळेत शिकत होता, त्याच शाळेत निवेदिता (पूर्वाश्रमीची निवेदिता चंद्रकांत पाटील, रा. पळी) हीदेखील शिकत होती. तेव्हापासून त्यांची ओळख. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. संवादाविनाही त्यांची ‘अबोल प्रीत’ फुलली, बहरली ती फक्त नि फक्त नजरेच्या इशार्यातून आणि हावाभावातून.
लग्नाच्या रेशीमगाठी या स्वर्गातच बांधलेल्या असतात असे म्हणतात, ते उमेश आणि निवेदिता यांच्याबाबतीतही खरे म्हणावे लागेल. कारण, चौथीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर दोघेही आपापल्या घरी होते. उमेश वडिलांच्या व्यवसायात त्यांना मदत करीत असे, तर निवेदिता आईला घरकामात हातभार लावे. पण, मन मात्र दोघांचे एकमेकांत गुंतले होते. दोघांनाही एकमेकांसोबत संसार करायचा होता. आयुष्यभर एकत्र राहायचे होते. दोघांच्या मनातील प्रेम जाणले होते ते त्यांच्या वडिलांनी. योगायोगाने उमेशचे वडील अनंत पाटील आणि निवेदिताचे वडील चंद्रकांत पाटील वर्गमित्र. पेझारीच्या नाना पाटील विद्यालयाचे विद्यार्थी. त्यांनीच दोघांच्या लग्नासाठी पुढाकार घेतला आणि लग्न निर्विघ्नपणे पार पडले.
सुरुवातीला घरच्यांनाही दोघांच्यातील इशार्यावर बोलण्याची वेगळीच गम्मत वाटायची आणि त्यामुळे तितक्याच वेळा एकमेकांच्या चेहर्यावर हसूदेखील पाहायला मिळायचे. शब्दात बोलण्यापेक्षा हावभावातून सुरु असलेला ‘मुका संवाद’ त्यांना आनंद देत असे. यातूनच एकमेकांना काय हवंय नको कळायला लागलं आणि दोघांचा जिव्हाळा वाढत गेला. तिच्या स्वप्नातील राजकुमार आणि त्याच्या स्वप्नातील परी ही प्रत्यक्षात अवतरल्यामुळे त्यांना स्वर्गही ठेंगणा वाटू लागला आणि दोघेही गुणगुणू लागले…
शब्द झाले मुके, बोलती पैंजणे
उतरले गाली या, सोवरी चांदणे
पाहताना तुला चंद्र ही लाजला
ओळखू लागलो…
तू मला… मी तुला…
अशा अबोल संवादातून त्यांचे प्रेम निर्माण झाले. बहरत गेले. एकमेकांना जुळवून घेण्याची तयारी असेल तर कोणतीही भाषा आड येत नाही, हे उमेश आणि निवेदिता यांच्याकडे पाहून लक्षात येते. उमेश अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये परिचर म्हणून काम करीत असून, संपूर्ण संसाराचा गाडा हाकण्यास मदत करीत आहे. आज या दोघांना दिव्या आणि दीक्षा अशा सुंदर जुळ्या मुली असून, त्या अलिबाग येथील केइएस नंदा देशमुख ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीत शिक्षण घेत आहेत. त्यांनी पेझारीच्या नाना पाटील हायस्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून, एकीने 94 तर दुसरीने 93 टक्के गुण मिळविले आहेत.
तुझ्या माझ्या नात्याला
गरज नाही शब्दांची
न बोलताही होते
देवाण-घेवाण भावनांची
खरंच आहे हे… शब्दरुपी संवाद या दोघांमध्ये नसला तरी स्पर्श अन् हावभाव यांनी मने जुळली आणि संसार सुखाचा झाला. व्यक्त होताना प्रेमाच्या वाटा वेगळ्या असल्या तरी, प्रेमाची भाषा एकच असते, हेच यावरुन सिद्ध होते. 14 फेब्रुवारी 2005 रोजी दोघेही लग्नबंधनात अडकले. आज उमेश आणि निवेदिता यांच्या लग्नाला 17 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या सुखी संसाराला मनःपूर्वक शुभेच्छा…