| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विवेक जागर संस्था यांच्या वतीने दि.14 ते 23 मे या कालावधीत ‘वारसा संतांचा.. अंधश्रद्धा निर्मूलनाचा’ या नावाने महाराष्ट्रभर जनप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महा. अंनिस राज्य सरचिटणीस नितीशकुमार राऊत यांनी दिली.
राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जन्मभूमीपासून या प्रबोधन यात्रेची सुरुवात होणार आहे. सेनगाव, मोझरी, मुक्ताईनगर, निफाड, त्रंबकेश्वर, आळंदी, देहू, पिंपळनेर, सासवड, श्रीगोंदा, आपेगाव, पैठण, दौलताबाद, नसरी नामदेव, गंगाखेड, परळी, मंगळवेढा अशा ठिकाणी या यात्रेचे कार्यक्रम होणार आहे. यात्रेचा समारोप पंढरपूर येथे होणार आहे.
या प्रबोधन यात्रेत कीर्तन, प्रवचन होणार आहेत. ह भ प श्यामसुंदर सोनर महाराज, ज्येष्ठ समाजवादी नेते सुभाष वारे, हरिदास तम्मेवार, मनोहर जायभाये, हनुमंत मुंडे हे मार्गदर्शन करणार आहेत. संघटनेचा सांस्कृतिक विभाग व विविध उपक्रम विभाग यात्रेचे आयोजन करत आहे. राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, प्रधान सचिव माधव बावगे, सुशीला मुंडे, संजय बनसोडे, नंदकिशोर तळाशीलकर, गजेंद्र सुरकार, राज्य सरचिटणीस कृष्णात कोरे, सुधाकर काशीद, संजय शेंडे, बबन कानकिरड, विनायक साळवे, ठकसेन गोराणे आणि अनिल करवीर, सुधाकर तट आदी यात्रा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत असल्याचे नितीनकुमार राऊत यांनी सांगितले.