। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापूर तालुक्यातील रानसईच्या बोरीची मळशी या जंगल भागात कुजलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह सापडला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने व ओळखीचा कोणताही पुरावा नसल्याने खालापूर पोलीसांसमोर मोठे आव्हान होते. परंतु पोलिस निरिक्षक अनिल विभूते यांच्या टीमने तपासाचे चक्र फिरवित महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवत अवघ्या 24 तासात खून्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. खालापूर पोलिसांच्या यशस्वी कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
खालापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (दि.6 जून) रानसई गावाच्या बोरीची मळशी या जंगलात एका महिलेचे प्रेत सापडल्याची खबर पोलिसांना मिळताच सपोनि गणेश कराड, सहा.फौजदार विनोद सुर्वे, पोह. नितीन शेडगे, निलेश सोनावणे व हेमंत कोकाटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर प्रथमदर्शनी ते प्रेत पंधरा ते वीस दिवसांचे असावे असा अंदाज बांधण्यात आला होता. प्रेत कुजलेले असल्याने महिलेची ओळख पटवणे हे पोलिसांसाठी आव्हानात्मक होते. पोलीस उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपासाच्या सूचना देत मार्गदर्शन केले. प्रेताची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या. परंतु कोणताही सुगावा अथवा धागेदोरे हाती लागत नसल्याने खालापूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे.रुग्णालयात नेला असता वैद्यकीय अधिकार्यांनी डोक्याला दुखापत झाल्यामुळे सदर महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तेव्हा त्या महिलेचा कोणीतरी घातपात केला असावा असा ठाम विश्वास पोलिसांना आल्याने जोरदार तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक अनिल विभूते रायगड किल्ल्यावरील बंदोबस्त आटोपून खालापूरला आले तेव्हा त्यांनी या घटनेचा पूर्ण आढावा घेतला व लगेचच पोलीस अधिक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांच्याबरोबर या घटनेबाबत चर्चा केली व त्यांच्या मार्गदर्शनानुसार पथके तयार केली आणि शोध सुरू केला.
शोधमोहिम सुरू असताना खालापूर तालुक्यातील उंबरे येथे राहणारे काळूराम मारुती वाघमारे हे आपल्या दोन मुलींसह खालापूर पोलिस ठाण्यात त्यांची पत्नी आशा वाघमारे ही 15 ते 20 दिवसांपूर्वी कोळशाच्या भट्टीवर काम करणारे मजूर शोधण्यासाठी कर्नाटक येथील राठोड मुकादम यांच्यासोबत खालापूरातील वावोशी व रानसई या ठिकाणी आली होती पण तेव्हापासून ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यासाठी आले असता पोलिसांनी सदर मयत महिलेच्या मृतदेहाचे फोटो दाखवले असता काळूरामने ती मयत महिला त्याची पत्नी आशा असल्याचे सांगितले. त्यानंतर लगेचच तपासाची चक्रे जोरात फिरली आणि आशाचा खून का? कोणी? व कशासाठी केला याचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले.
तपासात मिळालेल्या माहितीनुसार आशा वाघमारे ही मयत महिला त्यावेळी हिरामण जाधव यांच्या घरी आली होती. ती सुनिल पवार व कुमार वाघे यांना कोळशाच्या भट्टीवर कामाला नेणार होती व त्यासाठी तिने या दोघांना पैसेही दिले होते. पैसे दिले असल्याने लगेच कामावर चला असा तीने तगादा लावला होता. पण सुनील पवारची बायको लगेच कामावर जाण्यास तयार नव्हती त्यामुळे त्या रात्री त्या दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी रागाच्या भरात सुनिलने रात्री 9:30 च्या दरम्यान आशा वाघमारेला बोरीची मळशी या जंगलाकडे नेऊन तिचा खून करून तिचा मृतदेह झाडी झुडपात फेकून आरोपी आपल्या पत्नी व मुलांसह तेथून निसटला.
पोलिसांनी आरोपीच्या मोबाईलच्या लोकेशनद्वारे तो अहमदनगर जिल्ह्यात असल्याचे शोधून काढले व एक पथक त्याच्या शोधात नगरला पोहचले शेवटी माहितीच्या आधारे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील हरडगाव या ठिकाणी आरोपी सुनील च्या मुसक्या आवळल्या.खालापूर याचे विरूद्ध खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर मयत महिलेच्या मृत्युबाबत तसेच तीची ओळख पटविणे व आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करण्याची संपूर्ण कार्यवाही पोलीस अधिक्षक रायगड अशोक दुधे, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, खालापूर संजय शुक्ला यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल विभुते, सहा.पोलीस निरीक्षक गणेश कराड, युवराज सुर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक प्रदिप आरोटे, अविनाश पाटील, सहा. फौजदार विनोद सुर्वे, पोलीस हवालदार नितीन शेडगे, निलेश सोनावणे, हेमंत कोकाटे, विशाल सावंत, मनोज सिरतार, रणजित खराडे, बबन घुले यांनी कामगिरी पार पाडलेली आहे.