उच्चदाबाच्या तारांमुळे धोका; ग्रामस्थांचा विरोध डावलून काम पूर्ण
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
तालुक्यातील थळ गावात महावितरणकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु असून उच्च दाबाच्या तारांचे काम करताना सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले असल्याने भविष्यात दुर्घटना घडल्यास ग्रामस्थांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कामाविरोधात विकास काठे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी महावितरण उप कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन विरोध दर्शविला आहे.
याबाबत विकास काठे यांच्यासह आस्वाद घरत, विश्वास कुरुळकर, गणेश म्हात्रे, सुनिल कुरुळकर, विनीत कुरुळकर, संचित काठे, मनश्री काठे, प्रफुल्ल कुरुळकर आदींच्या शिष्टमंडळाने महावितरणचे उप कार्यकारी अभियंता कमळाकर अंबाडे यांची भेट घेतली. थळ येथे श्री स्वामी दत्त इलेक्ट्रीकल्स हे अरुण मेहता यांच्या हायटेंशन वायरचे काम करत आहेत. या कामासाठी जमिनीखालून टाकण्यात येत असलेल्या हायटेंशन वायरसाठी तीन फुट खुदाई ऐवजी दीड ते सव्वा फुटापर्यंतच खुदाई करण्यात आलेली आहे. तसेच त्याच्या बाजुला थळ चाळमळ्याकडे जाणारी पाण्याची लाईन काही इंचावरच आहे. तसेच टेलीफोन केबल व गावात फिरवल्या गेलेल्या इलेक्ट्रिक लाईनचे पोलही हाय टेंशन वायरला लागूनच आहेत. सेफ्टीच्या नावाखाली हायटेंशन वायरच्या खालीवर सिमेंटच्या नळ्या टाकण्यात आलेल्या आहेत. वादळी वार्यात पडझड होऊन दुर्घटना घडल्यास जिवीत हानी होण्याची शक्यता विकास काठे यांनी व्यक्त केली आहे. तसेच जमीनीखालून अवघ्या दीड ते सव्वा फुटापर्यंतच खुदाई करण्यात आली असल्याने पावसाळ्यात पाणी साचून जर विद्युत प्रवाह पसरला तर ग्रामस्थांच्या जीवावर बेतण्याची भीती देखील विकास काठे यांनी व्यक्त केली आहे. याबाबतचे निवेदन उच्च न्यायालय, राज्यपाल, विरोधी पक्षनेते आदींना देण्यात आले आहे.