। रेवदंडा । प्रतिनिधी ।
अलिबागहून रेवदंडा व मुरूड जाण्यासाठी नागाव बायपास रस्ता फारच महत्वाचा समजला जातो, या नागाव बायपास रस्त्यावर पाल्हे गावानजीक असलेला पूल धोकादायक परिस्थितीत असून त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दूर्लक्ष केले जात आहे.
पाल्हे पुलास धोकादायक असे खोल खड्डे पडले असून पुलावरुन बिनधास्तपणे वाहतूक सुरु आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येत असलेल्या पाल्हे पुलावर बांधकाम विभागाने कमकुवत पुल असा फलक लावला आहे. मात्र पर्यायी रस्ता दूर असल्याने त्यावरुन बिनदिक्कतपणे वाहतूक सुरु आहे. याकडे बांधकाम विभागाचे लक्ष नसल्यामुळे कोणत्याहीक्षणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.