गोरेगाव-माजलगाव बसमधील 33 प्रवासी सुखरूप; काच फुटून 10 हजारांचे नुकसान
। माणगाव । सलीम शेख ।
गोरेगाव-माजलगाव ही परिवहन महामंडळाची बस सकाळी ताम्हाणी घाटातून जात असताना कोंडेथर गावाच्या हद्दीत सकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास जात असताना दरडीचा मोठा दगड कोसळत खाली आला. त्याचे तुकडे बसच्या समोरील काचेवर व उजव्या बाजूकडील खिडकीवर पडल्याने बसची काच फुटून 10 हजार रुपयाचे नुकसान झाले. या घटनेत चालकासह सर्व प्रवास सुखरुप असून सर्वांच्या काळजाचा ठेका मात्र चुकला होता.
या घटनेची माहिती माणगाव तालुक्यात समजताच अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर माणगाव पोलीस ठाण्यात या बसचे चालक राजाभाऊ भागवत शिंगटे, (वय 39) यांनी माहिती दिली. माणगाव बस आगाराची गोरेगाव-पुणे-माजलगाव बस क्र. एमएच 20 बीएल 1167 हि सोमवारी (दि.18) 33 प्रवासी घेऊन सकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास कोंडेथर गावाच्या हद्दीतून जात होती. त्यावेळी ताम्हिणी घाटात रस्त्याकडेला असणार्या दरडीच्या दगडाचे तुकडे अचानक चालकाच्या समोरील काचेवर व उजव्या बाजूकडील प्रवासी काचेवर कोसळ्याने गाडीचे काचा फुटून 10 हजार रुपयाचे नुकसान झाले. मात्र सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही.
आंतरराष्ट्रीय दिघी बंदराशी जोडणार्या माणगाव-ताम्हाणी-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटाच्या संरक्षक भिंती धोकादायक झाल्या आहेत. तसेच या मार्गालगत उंच डोंगर असल्याने दरडी कोसळण्याची भीती प्रवासी वर्गातून होत असून अनेकदा याबाबत उपाययोजनांची मागणी करुनही शासनाच्या संबंधित खात्याने यावर उपाययोजना आखलेली नाही.
सार्वजनिक बांधकाम व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. 1998-99 मध्ये या रस्त्याचे काम करण्यात आले. त्यावेळेस पुणे-दिघी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडून करण्यात आला. त्यावेळेस काही ठिकाणी संरक्षक भिंतीचे काम डबर सिमेंटमध्ये करण्यात आले होते. परंतु ते काम मजबूत झाले नसल्यामुळे या संरक्षक भिंती आता कमकुवत झाल्या आहेत. या रस्त्याच्या साईडला खोल दर्या आहेत. त्यातच हा मार्ग अरुंद आहे. त्यामुळे समोरून येणार्या वाहनचालकांना धोका जाणवत आहे. काही ठिकाणी अवघड वळणांवर संरक्षणासाठी पत्र्याचे कवच उभारले आहे. तर काही ठिकाणी अवघड वळणांवर कोणत्याही प्रकारचे संरक्षणासाठी बांधकाम करण्यात आलेले नाही. त्यामुळे हा रस्ता अपघाताला निमंत्रण देत आहे. कोणतीही दुर्घटना या मार्गावर घडू नये, म्हणून शासनाच्या संबंधित खात्याने कमकुवत कठडे व धोकादायक वळणे यांना संरक्षण भिंत उभारणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रवाशी व पर्यटकांकडून होत आहे.