। उरण । वार्ताहर ।
15 ऑगस्ट 2022 रोजी देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. या निमित्ताने भारत सरकारने हर घर तिरंगा हे अभियान राबविण्याचा मानस जाहीर केला आहे. हे अभियान नवीन पिढीसाठी मार्गदर्शन करणारे आहे. तर सामान्य जनतेला आपल्या राष्ट्राप्रती स्वाभिमान जागविणारे आहे. त्यामुळे राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात अझादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत येत्या 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबविण्याचा संकल्प जाहीर केला आहे. या अभियानासाठी राज्याच्या ग्रामविकास आणि नगरविकास विभागातर्फे जय्यत तयारी सुरु आहे. मात्र केवळ हर घर तिरंगा फडकविण्याच्या नादात सरकारला स्वातंत्र्याच्या संग्रामात सहभाग घेऊन हौतात्म्य पत्करणार्या देशभत्तांचा विसर पडलेला दिसतो. त्यामुळे ब्रिटीशांच्या बेच्छूट गोळीबारात चिरनेर जंगल सत्याग्रहात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांचे तसेच जिल्ह्यातील हौतात्म्य पत्करलेल्या सर्वांचा यादिवशी स्मरण होऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित व्हावी अशी मागणी उरणच्या तमाम जनतेची आहे.
स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात चिरनेरचा जंगल सत्याग्रह हे एक दैदीप्यमान पर्व आहे. ब्रिटीश साम्राज्याच्या विरोधात स्वयंस्पुर्तीने घडलेला लढा आहे, याचे भान सरकरने राखणे गरजेचे आहे. ब्रिटीश सरकारला हादरा देण्यासाठी महात्मा गांधीजीनी केलेला मिठाचा सत्याग्रह असो, सविनय कायदेभंगाची चळवळ असो, अथवा चिरनेरचा जंगल सत्याग्रह असो या सर्वच सत्याग्रहाची नोंद भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरानी झालेली आहे. चिरनेरच्या जंगल सत्याग्रहात आजूबाजूच्या गावांतील, परिसरांतील सुमारे पाच ते सात हजार लोकांनी भाग घेतला होता. त्यापैकी धाकू गवत्या फोफेरकर, राम बामा कोळी, हसुराम बुधाजी घरत, रघुनाथ मोरेश्वर न्हावी, परशुराम रामा पाटील, आनंद माया पाटील, आलू बेमट्यां म्हात्रे, नाग्या महादू कातकरी हे ब्रिटीशांच्या गोळीबारात बळी पडले तर 38 ते 40 जण जखमी झाले हे सारे जण 20 ते 22 वर्षाचे तरुण होते.
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री ए.आर.अंतुले हे मुख्यमंत्री असताना 4 मार्च 1981 रोजी चिरनेर येथे हुतम्यांना मानवंदना देण्यासाठी आले त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी 1981रोजी क्रांतीदिनाचे औचित्य साधून अंतुले यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील हुतात्म्यांची हुतात्मा स्मारक योजना राबविली पण आज हर घर तिरंगा अभियान राबविताना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून साकारल्या जाणार्या या महोत्सवाने जरी देशात राष्ट्रभक्तीची लाट उसळत असली तरी स्वातंत्र्याच्या लढयात सिंहाचा वाटा असणार्या आणि स्वातंत्र्य संग्रामात बलिदान देणार्या हुतात्म्यांचा विसर होता कामा नये तर त्यासाठी देशभरांतील तमाम हुतात्म्यांना मानवंदना देणे हीच खरी राष्ट्रभक्ती ठरेल.