तिघे गंभीर जखमी, महिला सुदैवाने बचावली
खोपोली | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर खंडाळा घाटात उतारावर कि.मी. 37 जवळ रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास एका ईर्टिगा कारचा भीषण अपघात झाला. या अपघात सहा जणांचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत. दैवबलवत्तर म्हणून एक महिला या अपघातातून सुदैवाने वाचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडून मुंबईकडे जाणारी ईर्टिगा कार क्र. (एमएच 14 ईसी 3501) मध्ये चालक अधिक आठ प्रवासी होते. रात्री 11 वाजून 40 मिनिटांच्या दरम्यान हा अपघात झाला. सर्व प्रवासी हे वेगवेगळ्या ठिकाणहून मुंबईकडे जाण्यासाठी कारमधून प्रवास करत होते. ही कार मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ढेकू गावच्या हद्दीत आली असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारची अज्ञात वाहनाला मागून धडक बसली. धडक एवढी जबरदस्त होती की, त्यामध्ये प्रवास करणार्या अब्दुल रहमान खान (32, रा. घाटकोपर), अनिल सुनिल सानप, वसीम साजिद काझी (रा. राजापूर, जि. रत्नागिरी), राहुल कुमार पांडे (30, रा. कामोठे, नवी मुंबई), आशुतोष नवनाथ गाडेकर (23 म्हातारपाडा, मुंबई), अमिरुऊल्ला चौधरी हे मयत झाले असून, मच्छिंद्र आंबोरे (38 -चालक), दिपक खैराल हे जखमी झाले आहेत. अस्फीया रईस चौधरी (25, कुर्ला, मुंबई) या सुखरुप बचावल्या आहेत. दरम्यान, चौघांना गंभीर इजा झाल्या कारणे एमजीएम रुग्णालय कामोठे येथे नेण्यात आले. त्यादरम्यान त्यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. चालक आणि एक प्रवाशावर उपचार सुरू आहेत.
आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस, डेल्टा फोर्स, लोकमान्य रुग्णालय आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी यावेळी मदतकार्य केले. हा अपघात खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला असून, अपघातस्थळी खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, पोलीस निरीक्षक शिरीष पवार, पोलीस उपनिरीक्षक योगेश भोसले आदींनी भेट देत चौकशी सुरू केली आहे.