गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीवेळी सांगोल्यातून निवडणूक लढवण्यास आबासाहेबांनी असमर्थता दर्शवली. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. त्यांनीच निवडणूक लढवावी असं सगळे म्हणत होते. मात्र, त्यांनी भूमिका घेतली. 55 वर्षांपासून आपल्या पाठिंशी एकनिष्ठपणे उभं राहिलेल्या कार्यकर्त्यांची समजूत आबासाहेबांनी काढली. या व्हिडीओत ते म्हणत आहेत,गैरसमज करून घेतला आहे. निवडणुकीला उभं राहत नाही म्हणून राजकारण सोडलं असं समजू नका. शेवटच्या श्वासापर्यंत मी जनतेची सेवा करत राहणार आहे, मग आमदार असू द्या नाहीतर नसूद्या. पिढी तयार करण्याचं काम करणारच आहे, अशी ग्वाही गणपतराव देशमुख यांनी कार्यकर्त्यांना दिली. हे वचन त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत पाळलं. कोरोना काळातही ते लोकांना काळजी घेण्याबद्दल ते आवाहन करत राहिले.