| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शहापूर, धेरंडला बसलेल्या उधाणाने गावातील शेती, तलाव तसेच घरांमध्ये शिरल्याने येथील शेतीसह मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यासाठी शासनाने कुठल्याही प्रकारची नौटंकी न करता तातडीने पावसाळ्यापूर्वी या समस्येवर तोडगा काढावा, अशी माजी आ.पंडित पाटील यांनी केली आहे.
उधाणाची माहिती मिळताच पंडित पाटील यांनी तातडीने धेरंड, शहापूरचा दौरा करुन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी जि.प.सदस्या भावना पाटील, सुधीर थळे, सतीश म्हात्रे, अनिल म्हात्रे, अॅड. कुंदन पाटील, राजेंद्र पाटील, अजित पाटील, मंगेश पाटील, नीलम पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी पंडित पाटील यांनी सतत या उधाणामुळे गावकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. एमआयडीसी आणि खारलॅन्ड विभाग या समस्येबाबत खो-खो खेळत आहे तो तातडीने बंद करावा आणि कायमस्वरुपी बंधारा उभारावा, अशी मागणीही त्यांनी केली. या बंधार्यासाठी 65 लाखांचा निधी मंजूरही झालेला आहे. यासंदर्भात आपण प्रांत तसेच एमआयडीसीचे अधिकारी यांच्याशी चर्चाही केलेली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसादही दिलेला आहे. आता खालच्या यंत्रणेने वेळ न दवडता पावसाळ्यापूर्वी बंधारा बांधणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
सरकारनेही या समस्येवर आता कायमस्वरुपी तोडगा काढावा. पावसाळ्यापूर्वी जर बंधारा बांधला नाही तर येथील रहिवाशांचे कायमस्वरुपी अन्यत्र स्थलांतर करावे लागेल, असेही पंडित पाटील म्हणाले. जिल्हा प्रशासनाने देखील कंपन्यांकडून मिळणारा सीआरएस फंडचा विनियोग खारभूमीच्या कामासाठी वापरावा, अशी सुचनाही पंडित पाटील केली.