आदिवासी शेतकर्याची यशोगाथा; पाणीटंचाईवर केली मात
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुका आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. याचे कारण तालुक्यात आदिवासी दुर्गम भाग मोठ्या प्रमाणात आहे. तर या भागात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य आहे. अशात याच पाणीटंचाईवर मात करत तालुक्यातील ओलमन येथील आदिवासी शेतकरी प्रभाकर रामचंद्र पादीर यांनी चक्क माळरानावर फळबाग फुलवली आहे. तर, या फळझाडांसाठी पाण्याचे नियोजन म्हणून त्यांनी प्लास्टिक बाटल्यांचा केला आहे. त्यामुळे माणसाने मनात आणलं आणि त्याची इच्छाशक्ती मजबूत असेल तर काहीही करू शकतो, हे पादीर यांनी दाखवून दिले आहे.
भाताचे कोठार असा कर्जत तालुक्याचा लौकिक होता. मात्र, आता शेतीसाठी खर्च अधिक आणि तोटा जास्त, विभक्त कुटुंब पद्धती, त्यात मजूर मिळत नाहीत, खत, बियाणे यांवर होणारा अफाट खर्च शासनाकडून मिळणारा कवडीमोल भाव यामुळे शेती करणे परवडणारे राहिले नाही. त्यामुळे मागील काही वर्षात तालुक्यात हजारो एकर शेती बिनशेतीमध्ये रूपांतरित झाली आहे. तर याच शेतीवर गृहप्रकल्प व फार्महाऊसेस उभी राहात आहेत. मात्र, दुसरीकडे वडिलोपार्जित शेती संभाळण्यावर आजही काही शेतकरी भर देत असल्याचं सकारात्मक चित्र आहे.
तालुक्यातील ठाणे जिल्ह्याच्या हद्दीजवळ ओलमन गाव हे मोजक्याच घरांची वस्ती असलेले गाव. याच गावातील प्रभाकर रामचंद्र पादीर यांची गावाच्या खालच्या भागात 12 एकर माळवरकस शेती आहे. वडिलोपार्जित शेती असूनदेखील पादीर यांनी ती शेती आजही सांभाळून ठेवली आहे. तर या शेतीत काहीतरी करायचे असा त्यांनी काही वर्षांपूर्वी विचार केला. मात्र, माळवरकस असल्याने कशाला काही असे अनेकांनी त्यांना समजावले पण पादीर यांचा निश्चय दृढ होता. त्यामुळे सुरवातीला त्यांनी तिथे साफसफाई करून काही आंब्यांची कलमे लावली. त्यानंतर दोन वर्षे ती जगल्यावर त्यांनी जवळील प्रकृती संस्थेला भेट देऊन त्यांच्याकडून मदत घेतली. आणि मागील पावसाळ्यात 200 पपई व 160 आंब्यांची रोपे त्यांनी आपल्या दोन एकर शेतात लागवड ही रोपेदेखील प्रकृती संस्थेने त्यांना दिली. तर यानंतर मोठे संकट होते ते पाण्याचे! ही गोष्ट प्रभाकर यांच्या लक्षात होती. म्हणून त्यांनी आपल्या जागेत एक शेततळे निर्माण केले. तर पाऊस सरल्यावर समोरून जाणार्या नाल्यातील पाणी पंपाच्या सहाय्याने आपल्या शेतातील तळ्यात साठवून ठेवले.
आपल्या शेतीतील झाडांना लगडलेली फळे हि रुचकर असायला यासाठी प्रभाकर पादीर यांनी जीवामृत, शेणखत आदी खते शेतातच बनवून झाडांना त्याची मात्रा दिली आहे. त्यामुळे शून्य खर्चात जास्त उत्पादन व रासायनिक खतमुक्त फळांचे उत्पादन त्यांना मिळणार आहे. प्रभाकर पादीर यांना या कामात त्यांची पत्नी चांगुणा पादीर सुद्धा मदत करतात. पाण्याचे उत्तम नियोजन केल्यामुळे आता पपईच्या झाडांना फळे लगडली तर 3 वर्षांपूर्वी लागवड केलेल्या आंब्यांच्या झाडांपासून त्यांना मागील वर्षी पाच क्विंटल आंब्यांचे उत्पादन मिळाले. यंदा आंब्यांच्या झाडांनादेखील मोहोर चांगला आला असून, आंबे आणि पपई अशी दोन्ही झाडांचे चांगले उत्पादन त्यांना मिळेल अशी आशा आहे. तर प्रभाकर पादीर यांची ही शेती सगळ्या शेतकर्यांसाठी आदर्शवत ठरत आहे.
माणसाने ठरवलं त्याला काहीही अशक्य नाही. शेती ही आपली आई आहे. तिच्यात घाम गाळला तर कातळ असलेल्या भागातसुद्धा पीक बहरते. मी विचार केला होता त्याला प्रकृती संस्थेची साथ मिळाली, त्यामुळे आज दोन एकरावर माझी शेती बहरली आहे. यंदा चांगले उत्पन्न मिळाले तर हीच शेती अजून वाढवण्याचा माझा मानस आहे. – प्रभाकर आदिवासी शेतकरी, ओलमन