रायगड जिल्ह्यातील राजकीय धुरंधर आणि झुंजार नेते भाई जयंत पाटील हे कडव्या डाव्या विचारसरणीचे नेते आहेत. कोणत्याही सत्तेत नसताना रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाची पाळेमुळे त्यांनी खोलवर रुजवलेली आहेत. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. सहकार क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. शेकापची मते निवडणुकीत ठाम आणि निर्णायक ठरतात हे पाहिल्यानंतर दिसून येते.
1995 मध्ये स्व. भाऊ प्रभाकर पाटील यांनी ‘कृषीवल’मध्ये अप्रतिम आणि अभ्यासपूर्ण अग्रलेख लिहून भाई जयंत पाटील यांचे मुक्तकंठाने कौतुक केले होते. त्यांनी राजकीय चाल खेळली. त्यावेळी रमेश डाऊर यांना रा.जि.प.चे अध्यक्ष करून सर्वांना राजकीय धक्का दिला होता. तेव्हा भाऊंनी लिहिले होते की, ‘पुत्र व्हावा असा गुंडा, त्याचा फडकावा त्रिलोकी झेंडा’. या सुपुत्राने त्यानंतर राजकारणात कधीच मागे वळून पाहिले नाही. लाल बावटा आजही कायम कार्यकर्त्यांनी जिवापाड जपला असून, त्यांना लाल सलाम करीत आहेत. त्यांचा राजकीय दरारा आजही रायगड जिल्ह्यात कायम आहे. यशस्वी राजकारण करताना त्यांनी कोणालाही दगा आणि धोका दिला नाही. छक्के पंजे करुन फसविले नाही आणि गद्दारी केली नाही. जे केले, ते उघडपणे समोरासमोर केले. रायगडचा पुढील खासदार कोणत्या पक्षाचा करायचा हे सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून असणार आहे. हे प्रत्येक वेळी दिसून आले आहे. त्यामुळे शेकापला कुणीही गृहीत धरून चालणार नाही, असा आजवरचा इतिहास आहे.
शब्दाला पक्के असणाऱ्या जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीन पिढ्या यशस्वी समाजकारण करीत आहेत. 1997 मध्ये मी अपक्ष म्हणून जिल्हा परिषद निवडणूक लढलो होतो. त्यावेळी भाई जयंत पाटील यांनी पाठिंबा देऊन सर्वोतोपरी मदत केली होती. त्यामुळे मी निवडून आलो होतो, हे मी विसरलेलो नाही. 1995 मध्ये माझे वडील अशोक साबळे यांना विधानसभा उमेदवार म्हणून तिकीट नाकारले होते. तेव्हा अपक्ष उभे राहा, शेकाप पाठिंबा देईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, नाना सावंत ऐकले नाहीत. परंतु, असे झाले असते तर राजकारण बदललेले असते. जयंत पाटील यांनी आयुष्यभर डावी विचारसरणी कायम जपली. त्यांनी कधीही व्यावहारीक युती-आघाडी केली नाही. तडजोड मान्य केली नाही. त्यांना रायगड जिल्ह्यातील शिवसेनेबरोबरची युती अमान्य होती. त्यामुळे ते सहसा कधीही सेनेच्या व्यासपीठावर उपस्थित नव्हते. तसेच ते उघड वा मुक्तपणे वावरताना दिसले नाहीत. ते आपल्या डाव्या विचारसरणीवर ठामपणे असून, त्यांच्या घराण्यातील कोणीही व्यक्ती त्यांच्या शब्दाबाहेर जात नाही.
माझ्या वडिलांना सभापती करण्यात प्रभाकर पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते. 1970 च्या सुमारास माझी आई वंदना अशोक साबळे यांची रायगड जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्य म्हणून निवड केली होती. तेव्हा आई मला लहानपणी जिल्हा परिषदेत घेऊन जात असे. तेव्हापासून माझे आणि जिल्हा परिषदेचे नाते जुळून राहिले आहे. मी विरोधी पक्षनेता, शिक्षण सभापती, स्थायी समिती सदस्य म्हणून 15 वर्षे काम केले. वडील वेगळ्या पक्षात होते, तरीही आई मात्र प्रभाकर भाऊ पाटील सांगतील त्यांना मतदान करीत असत, अशी आठवण भाई सांगतात. आमचा कितीही राजकीय संघर्ष झाला असेल किंवा राजकीय मतभेद असले तरी कौटुंबिक संबंध जपून ठेवले आहेत. 1980 मध्ये वडील अशोक साबळे हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. त्यावेळी प्रभाकर पाटील आणि जयंत पाटील यांनी फार मोठे सहकार्य आणि मदत केली होती, हे मी विसरलेलो नाही. मी कधीही घरी गेलो तर माझा हात धरून कल्पनाताई जेवल्यावरच पाठवतात. ही परंपरा त्यांनी जपली आहे. आमचे मतभेद असले तरी मनभेद कधीच होणार नाहीत, याची काळजी घेत असतो. पंडित पाटील, आस्वाद पाटील हे आजही कौटुंबिक मायेचा ओलावा आणि जिव्हाळा ठेवत आहेत, याचा मला अभिमान वाटतो. स्व. प्रभाकर पाटील, आ. जयंत पाटील, आस्वाद पाटील या त्यांच्या तिन्ही पिढ्यांबरोबर काम करणारा एकमेव कार्यकर्ता मी आहे, याचा मला गर्व वाटतो.
आमदार जयंत पाटील यांच्या पक्षाकडे विधानपरिषदेत पुरेसे संख्याबळ नसताना दोनदा आमदार झाले. एकेकाळी त्यांच्या पक्षाकडे 42 आमदार होते. यापूर्वी 3 ते 5 होते. तरीही ते सहज निवडून आले होते. यावेळीही ते पुन्हा चमत्कार करून महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळं स्थान निर्माण करतील, असा आत्मविश्वास वाटतो. त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांच्या हातून सामान्य माणसाची सेवा घडावी यासाठी वाढदिवशी शुभकामना व्यक्त करतो.
– अरुण पवार