चौसष्ट हजार शेतकरी लाभार्थी; 27 हजार हेक्टर पीक क्षेत्राला विमा कवच
| रायगड | प्रतिनिधी |
यंदा पहिल्यांदा राज्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा भरण्याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे. सरकारच्या या योजनेतून एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतातील उभ्या पिकाचा विमा उतरवता येणार आहे. यात रायगड जिल्ह्यातून 49 हजार 803 बिगर कर्जदार, तर 14 हजार 426 कर्जदार अशा 64 हजार 229 शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे. यंदा हा रायगड जिल्ह्याचा विक्रम असून, सरकारने विमा कवच उतरवण्यास आणखी तीन दिवसांची मुदत दिल्याने या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. असे असले तरी तब्बल 25 हजार शेतकऱ्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा फटका बसला आहे. यामुळे पीक विमा उतरविण्यासाठी शासनाने मुदत वाढवून द्यावी, असा सूर शेतकऱ्यांनी आळविला आहे.
मागील वर्षी सात हजार 862 शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत विमा उतरवला होता. लहरी हवामानामुळे रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांचे दर वर्षी नुकसान होते. एकतर जास्त पाऊस पडतो किंवा पाऊसच न पडल्याने शेतकऱ्यांचे पीक हातातून जाते. अशा परिस्थितीत त्यांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारने ‘एक रुपयात पीक विमा’ ही योजना लागू केली. यापूर्वी या योजनेसाठी शेतकऱ्यांना 1 हजार रुपये मोजावे लागत होते. यंदा 31 जुलै 2023 पर्यंत जुलैच्या पहिल्या आठवड्यात केवळ तीन हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यामुळे रायगड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यकांनी शेतकऱ्यांचे समुपदेशन केले. त्याचबरोबर राज्य सरकारने या योजनेसाठी तीन दिवसांची मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा काढून घेतला आहे.
लहरी हवामानामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ‘एक रुपयात पीक विमा’ योजना देऊ केलेली असताना त्याकडेही रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती. जिल्ह्यात 9 हजार 778 हेक्टरवर खरिपाची पेरणी झालेली असताना प्रत्यक्षात फक्त तीन हजार शेतकऱ्यांनी 1 हजार 346 हेक्टरचा पीकविमा उतरवला होता. रायगड जिल्ह्यात सुमारे 90 हजार शेतकरी खातेदार आहेत. असे असताना विमा उतरविण्याची मुदतवाढ संपली त्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील 64 हजार 229 शेतकऱ्यांनी विमा उतरविला. कृषी विभागाने केलेल्या अवाहनानंतर रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्यासाठी पुढाकार घेतला. परंतु, इंटरनेट कनेक्टिव्हीटी सुरळीत नसल्याने आणि पीक विमा उतरविण्याचे संकेत स्थळ हँग झाल्याने शेतकऱ्यांना सायबर कॅफेमधून परत यावे लागले.
वेबसाईट हँग
सरकारकडून पीकविमा भरण्यासाठी तीन दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतर मंगळवारी विमा भरण्यासाठी असणारी विमा कंपनीची वेबसाईट हँग झाली होती. यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी सीएससी सेंटरवर बसून होते. जिल्ह्यात 64 हजार 229 शेतकऱ्यांनी केवळ एक रुपयात पीक विमा उतरवला आहे. शेतकऱ्यांनी विमा उतरविल्याने 27 हजार 195 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. या विम्यापोटी रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा राज्य सरकारने 5 कोटी 28 लाख तर केंद्र सरकारने 2 कोटी 51 लाख असा 7 कोटी 79 लाख रुपयांचा लाभार्थी हिस्सा भरलेला आहे.