महावितरणचा ढिसाळपणा चव्हाट्यावर
सोशल मीडियावर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया
। अलिबाग । वार्ताहर ।
मान्सूनच्या अंदाजाचा अंदाज चुकवत आज संध्याकाळनंतर रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात काही क्षणाच्या पावसाचा जोरदार शिडकावा आला, यामुळे घरी परतणाऱ्या कामगारवर्गाची व नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली.
या काही क्षणाच्या पाऊसामुळे मात्र जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला, यामुळे पुन्हा एकदा महावितरणच्या ढिसाळ कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली. मान्सूनपूर्व केलेल्या कामाची मात्र हिच ती पोच पावती आहे का?असा संतप्त सवाल जिल्ह्यातील नागरिक सोशल मीडियावर व्यक्त करत असल्याचे दिसले. तसेच नागरिक आत्ताच ही परिस्थिती आहे तर अजून पुढे काय होणार, असा संताप नागरिक व्यक्त करताना दिसले, शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित असल्याचे समजले. याबाबत अधिक माहितीसाठी महावितरणच्या अधिकारी वर्गाला संपर्क साधला असता तो झाला नाही.